Satara News : कोयना धरणातून पूर्व भागासाठी 30 नव्हे, थेट 50 टीएमसी पाणी; ऊर्जेच्या माध्यमातून जलवाटप वाढणार!

कोयनानगर : दि. २५ जून राज्य शासनाच्या पर्यायी ऊर्जा आणि जलव्यवस्थापन धोरणांतर्गत, कोयना धरणाच्या डाव्या तीरावर ८० मेगावॅट क्षमतेच्या पायथा वीजगृह प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र जलविद्युत निर्मिती कंपनी (महाजेनको) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या १०८.७८ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य मंत्रिमंडळाने जून २०२५ मध्ये मंजुरी दिली.
या प्रकल्पाची रचना अशी आहे की, उपसा सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे २० टीएमसी पाण्यावर आधी वीजनिर्मिती केली जाणार असून, त्यानंतर तेच पाणी शेती सिंचनासाठी सोडले जाणार आहे. या अभिनव संकल्पनेमुळे कोयना धरणाचा एकाच पाणीसाठ्यावर दुहेरी उपयोग करता येणार आहे. यामधून ऊर्जानिर्मितीही होणार आहे आणि सिंचनाचे उद्दिष्टही साध्य होणार आहे.
या प्रकल्पाचा थेट संबंध टेंभू व ताकारी उपसा सिंचन योजना यांच्याशी आहे. योजनेतील उपसा प्रक्रियेतून पाणी उचलले जाईल, ते पाणी आधी वीजगृहातून जाऊन वीज निर्माण करेल आणि नंतर शेतीसाठी वितरणासाठी सोडले जाईल. यामुळे राज्य शासनाच्या धोरणानुसार ऊर्जेचा अतिरिक्त स्त्रोत निर्माण होईल आणि पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित केला जाईल.
सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या प्रकल्पामुळे कोयना धरणातून पूर्व महाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी सध्या दिल्या जाणाऱ्या ३० टीएमसी पाण्यात थेट ३० टीएमसीने वाढ होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्व भागाला एकूण ५० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे राज्याच्या सिंचन धोरणात एक मोठे पाऊल मानले जात आहे.
सध्या कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी धरणातून सांडपाण्याचा कार्यक्षम वापर करून आधी वीज निर्मिती करणे आणि त्यानंतर तेच पाणी सिंचनासाठी वापरणे ही शासनाची यशस्वी रणनीती ठरणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ये
या प्रकल्पाची काही तांत्रिक वैशिष्ट्ये अशी आहेत की एकूण क्षमता ८० मेगावॅट असून त्यासाठी प्रत्येकी २६.६६ मेगावॅट क्षमतेचे तीन टर्बाईन युनिट्स बसवले जाणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र जलविद्युत निर्मिती कंपनीमार्फत होणार आहे.
या प्रकल्पामुळे कोयनानगर व परिसरात नागरी व यांत्रिकी कामांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ऊर्जा, सिंचन आणि स्थानिक विकास या तिन्ही घटकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.





