मेलबर्न – भारतीय संघाच्या मानहानिकारक पराभवानंतर माजी कसोटीपटू व तंत्रशुद्ध फलंदाज तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादनीचा संचालक राहुल द्रविड याला ऑस्ट्रेलियात फलंदाजीचा सल्लागार म्हणून पाठवण्याची मागणी अनेक स्तरांवरून होत असली तरीही तसा कोणताही विचार नसल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिल्या कसोटीतील कामगिरीवर आम्ही नाराज आहोत आणि त्यामुळे बीसीसीआय चिंतेत आहे. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा याबाबत काही योजना ठरवत आहेत. भारतीय संघाची कामगिरी सुधारावी यासाठी ते योजना बनवत आहेत. संघ व्यवस्थापनाच्या संपर्कात राहूनच या गोष्टी ठरवण्यात येणार आहेत. मी याबाबत आशावादी असून पुढच्या सामन्यात भारतीय संघाकडून चांगली कामगिरी होईल, असा मला विश्वास आहे .
द्रविडला पाठवण्याचा सध्या कोणताही विचार नाही. भारताची कामगिरी पहिल्या डावात चांगली झाली होती, पण दुसऱ्या डावात त्यांच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली. कधी कधी अशा गोष्टी क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. भारतीय संघातील खेळाडूंकडे चांगली गुणवत्ता आहे. त्यामुळे मेलबर्न कसोटी सामन्यात त्यांच्याकडून चांगली कामगिरी होईल, अशी मला आशा आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात नेमके काय करायला हवे, याबाबत आमची चर्चा सुरू आहे, असा खुलासा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केला आहे.