Pune District : वारकऱ्यांच्या सेवेत कसूर नको : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पाच संताच्या पालख्या; १६ मुक्काम
Pune District : लाखो वारकरी आणि भाविक इंदापूरात दाखल होणार असल्याने प्रशासनाने सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

इंदापूर : आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्म, सामाजिक समता आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. लाखो वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कसूर होता कामा नये. प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा मिळाल्याच पाहिजेत. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने काम करावे, अशा स्पष्ट शब्दांत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ११) इंदापूर तहसील कार्यालयात कृषिमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची आढावा बैठक झाली. यावेळी पालखी मार्गावरील सुविधा, मुक्काम व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज आणि वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस बारामतीचे प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार जीवन बनसोडे, नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत शहा, मुख्याधिकारी रमेश ढगे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, पंचायत समिती सभापती हर्षवर्धन लोंढे, उपसभापती जयकुमार कारंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सोनाली जाधव, नगरपालिकेचे गटनेते शकील सय्यद, पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, शुभम पवार, उमेश मखरे, पोपट शिंदे, अमर नलवडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यंदा तालुक्यातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका महाराज, संत चांगावटेश्वर महाराज, संत निळोबाराय महाराज आणि संत चौरंगीनाथ महाराज या पाच संत पालख्यांचे मार्गक्रमण होणार असून, तालुक्यात एकूण १६ मुक्कामांचे नियोजन करण्यात आले आहे. लाखो वारकरी आणि भाविक इंदापूरात दाखल होणार असल्याने प्रशासनाने सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या. पाणीपुरवठा विभागाकडून आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विश्लेषण करून त्यानुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पालखीसोबत ५० पोलीस मोटारसायकली कार्यरत राहतील. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी पंचायत समितीमार्फत फिरती सार्वजनिक स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, मोबाईल चार्जिंग सुविधा, चरणसेवा केंद्र तसेच महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.
वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. वारकऱ्यांची सेवा करणे हेच आपले कर्तव्य आहे. पालखी मार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, अखंड वीजपुरवठा, सुरक्षित वाहतूक आणि मुक्कामस्थळी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात. कोणत्याही विभागाकडून हलगर्जीपणा होऊ नये. वारकऱ्यांच्या सेवेत कसूर अजिबात खपवून घेतली जाणार नाही.
-दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री.
तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाच्या दुरवस्था
आढावा बैठकीदरम्यान जिल्हा परिषद सदस्या निर्मला मिसाळ यांनी तहसील कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या अस्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागाला तातडीने स्वच्छता मोहीम राबवून आवश्यक दुरुस्ती आणि सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश दिले.





