अकोला – वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका मांडली. लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. जवळपास 40 जागांवर सर्वपक्षीयांचे एकमत झाले आहे, 8 जागांवर चर्चा सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासह वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीत आहे.
जागावाटपाच्या चर्चेबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, कालच्या बैठकीत मविआचेच काही ठरले नसल्याचे लक्षात आले. त्यांचे ठराव म्हणून आम्ही आमचे काही मुद्दे समोर ठेवले आहेत. किमान समान कार्यक्रम, मराठा आणि ओबीसी आरक्षण, दिल्लीतील शेतकरी आंदोलन असे 15 मुद्दे आम्ही कालच्या बैठकीत मांडले.
कालच्या बैठकीत जागा वाटपावर काय ठरले, याची माहिती मागितली.2 तारखेच्या बैठकीपर्यंत जागा वाटपाचा फॉर्मुला स्पष्ट करण्याचा आग्रह केला. आम्ही आमचा इगो आड येऊ देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीमध्ये समावेश झालेला नाही. जे पत्र आम्हाला दिले आहे त्या पत्रावर फक्त काँग्रेसच्या नाना पटोले यांची सही आहे, त्यावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचे असेल तर काँग्रेसच्या वरच्या नेतृत्वाने (दिल्लीतलं हायकमांड) मान्यता दिली पाहिजे. हायकमांडने तशी मान्यता दिली आहे की नाही, हे अद्याप आम्हाला माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.