मुंबई : राज्याच्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात राजकारण चांगचेच तापले आहे. कारण आता मविआकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात मविआकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवण्यात आले आहे. पण या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नाही. विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहित नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे. विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हे पत्र दिले आहे. काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर,अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या या पत्रावर सह्या आहेत. पण या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नाही. विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहित नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांना सभागृहात बोलून दिले जात नसल्याने मविआने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या प्रस्तावाबाबत पुढचा निर्णय काय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असलं तरी भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत असल्याने प्रस्ताव आणला तरी तो मंजूर होण्याची शक्यता मात्र कमीच आहे
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांविरोधात मविआचा नाराजीचा सूर होता. जो आता अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून अधिक आक्रमकपणे समोर आला आहे. आता या अविश्वास प्रस्तावावर सत्ताधाऱ्यांकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.