पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरूवारी राजकीय गुगली टाकली. मी मुख्यमंत्रिपदावर दावा केलेला नाही. त्याविषयीचा निर्णय एनडीए घेईल, असे अनेकांच्या भुवया उंचावणारे वक्तव्य त्यांनी केले.
बिहारची सत्ता राखण्यात एनडीएला यश आले. मात्र, संख्याबळाचा विचार करता भाजप नितीश यांच्या जेडीयूपेक्षा मोठा पक्ष ठरला आहे. नितीश यांच्याकडेच धुरा सोपवण्याची ग्वाही भाजपकडून देण्यात आली आहे. तसे असले तरी एनडीएमधील बदललेल्या समीकरणांमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
अशात निवडणूक निकालानंतर नितीश यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री कोण बनणार, असा प्रश्न विचारण्यात आला. उद्या (शुक्रवार) एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल. बिहारच्या जनतेने एनडीएला कौल दिला. त्यामुळे एनडीएचे सरकार स्थापन होईल. शपथविधीची तारीख एनडीएच्या बैठकीत निश्चित केली जाईल, असे उत्तर नितीश यांनी दिले.
एनडीएमधून बाहेर पडून लोजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्याचा मोठा फटका बसल्याने जेडीयूच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे लोजपला पुन्हा एनडीएत स्थान मिळेल का, असा प्रश्न नितीश यांना विचारण्यात आला. त्यावर मला काही बोलायचे नाही. त्याविषयीचा निर्णय भाजपने घ्यायचा आहे, असे ते उत्तरले.