मुंबई- प्रबोधन, प्रशिक्षण व संस्कारातून माणसाच्या जिवनाला दृष्टिकोन प्राप्त होतो. पण आज दुर्दैवाने ना उजवे, ना डावे, सध्या संधीसाधूपणा हेच राजकारणाचे सूत्र बनले आहे. सद्यस्थितीत कोण कुठल्या पक्षात जातील व लगेच बाहेर पडतील हे कुणीच सांगू शकत नाही, अशा शब्दांत भाजप नेते तथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले आहे.
मुंबईच्या पार्लेत गुरुवारी लोकमान्य सेवा संघातर्फे लोकमान्य गप्प नामक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नितीन गडकरी यांनी उपरोक्त भाष्य करत पक्षांतर करून स्वतःच्या विचारधारेला तिलांजली देणाऱ्या लोकप्रतिनिधी व नेत्यांना फटकारले आहे.
गडकरी पुढे म्हणाले की, राजकीय पक्षाचा व विचारांचा काय संबंध? राजकीय पक्षांचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात. देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही सर्वच क्षेत्रातील समस्या आहे. जनता जात-पंथ-धर्म-भाषा आणि लिंगाच्या आधारावर मतदान करेल तोपर्यंत नेतेही तसेच येतील. पण जनता जागृत होईल, या सर्व गोष्टींना महत्त्व देईल व निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करेल तेव्हा आपसूकच परिवर्तन घडून येईल, असे गडकरी म्हणाले.
विचारांशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे
नितीन गडकरी यांनी यासंबंधी कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते ए. बी. वर्धन यांचा यावेळी दाखला दिला. ते म्हणाले की, कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख ए बी वर्धन यांचे माझ्यावर फार प्रेम होते. ते खूप विद्वान होते. ते आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षात राहिले. त्यांनी केव्हाही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. एखाद्या माणसाचे विचार कदाचित तुम्हाला पटत नसतील. पण त्या विचारांशी प्रामाणिक राहून आयुष्यभर त्याची किंमत चुकवून त्यासाठी जगणारे लोक आजही आपल्या समाजासाठी आदर्श आहेत.