नवी दिल्ली – निती आयोगाच्या गव्हर्निग कौन्सिलची बैठक सात ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत होणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये आर्थिक परिस्थितीसोबत कृषी क्षेत्र आणि आरोग्य विषयावर तपशिलात चर्चा केली जाण्याची शक्यता असल्याचे नीती आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
गव्हर्निग कौन्सिलमध्ये मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक आणि अनेक विभागाचे मंत्री सदस्य असतात. निती आयोगाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान असतात. या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शहर सुधारणा आणि प्रशासन त्याचबरोबर पीक पद्धतीतील बदलावर विशेष चर्चा केली जाणार आहे. भारताने आत्मनिर्भर धोरण राबविले आहे. गळीत धान्य, डाळी आणि इतर कृषी उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.
या दृष्टिकोनातून या परिषदेमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. निती आयोगाच्या परिषदेची बैठक दरवर्षी एकदा होते. या अगोदर नियोजन आयोग होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर 8 फेब्रुवारी 2015 पासून नियोजन आयोगाचे रूपांतरण निती आयोगात करण्यात आले आहे.