Nitesh Rane: मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्याकडे कूच केली होती. मात्र त्यांनी पुन्हा अंतरवालीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही जरांगे यांनी फडणवीसांवर केली. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील, असे प्रत्युत्तर नितेश राणे यांनी जरांगे यांना दिला. तसेच मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, असेही नितेश राणे म्हणाले.
काय म्हणाले नितेश राणे ?
“पहिल्या दिवसापासून आम्ही भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही समाजाच्या प्रश्नावर एक आहोत. एक व्यक्ती म्हणजे सरकार नाही. सगेसोयरेबाबत लवकरच निर्णय होईल. जरांगे हे शरद पवार गटाच्या जवळचे आहेत, ते कुणाच्या जीवावर शिव्या-शाप देत आहेत. जरांगेनी राजकारण सोडून भूमिका घ्यावी. जी टीका शरद पवार गटातले नेते करतात, जी भाषा उद्धव ठाकरे भाषणाच्या माध्यमातून वापरतात, तीच भाषा जरांगे पाटील करतात सेम त्यांचं भाषण कॉपी आणि पेस्ट केलं आहे,” असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, “एक व्यक्ती मराठा समाजाची बदनामी करत असेल तर खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाची बाजू लावून धरणार आहेत. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील. कुणी विनाकारण केसेस अंगावर घेऊ नयेत.
जरांगेंचे जुने सहकारी बोलतात की ते शरद पवारांच्या जवळील आहेत, मग हा तुतारीचा आवाज आहे का? “असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जरांगेचा फडणवीसांवर गंभीर आरोप
“मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मला उपोषणात मरु द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीस यांचं स्वप्न आहे,”असे जरांगे यांनी म्हटले.