नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयांवर जाहीर टीका करणाऱ्या स्वामी यांनी आता सीतारामन यांच्या अर्थविषयक ज्ञानावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शनिवारी केलेल्या एका ट्वीटमध्ये डॉ. स्वामी म्हणाले की निर्मला सीतारामन अर्थशास्त्रात निरक्षर आहेत. त्या काहीपण बोलू शकतात. माध्यमे डरपोक असल्यामुळे ती सीतारामन यांना कठीण प्रश्न विचारू शकत नाहीत. यापूर्वीही त्यांनी सीतारामन यांना लक्ष्य केले होते.
तेलंगणा दौऱ्यावर असताना एका रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र नसल्यामुळे सीतारामन यांनी अधिकाऱ्यांवर फैलावर घेतले होते. त्यावरून डॉ. स्वामी यांनी सीतारामन यांना लक्ष्य केले होते. खुशामत करण्याची ही परिसीमा झाली असे ते त्यावेळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते. त्यांनी अन्यही शब्दांचा वापर करून त्यांच्यावर टीका केली होती.