नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. आज पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहारच्या जेल क्रमांक तीनमध्ये चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ताला फाशी देण्यात आली. एकाच वेळी चारही दोषींना फाशी देण्याची ही जेलच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचं तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.
दोषींना फासावर लटकवल्यानंतर डॉक्टरांचं पथक जेलमध्ये जाऊन चारही दोषींचा मृत्यू झाल्याची पुष्टी करतील. त्यानंतर दोषींचे मृतदेह दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले जातील. मग दिन दयाल उपाध्याय रुग्णालयात त्यांचं शवविच्छेदन केलं जाईल.
Delhi: Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim show victory sign after Supreme Court’s dismissal of death row convict Pawan Gupta’s plea seeking stay on execution. pic.twitter.com/FPDy0hgisv
— ANI (@ANI) March 19, 2020
निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
Delhi: Badrinath Singh, father of 2012 Delhi gang-rape victim shows victory sign, says, “Today is our victory and it happened because of media, society & Delhi police. You can understand what is inside my heart by my smile”. pic.twitter.com/lGhzP2lPAV
— ANI (@ANI) March 20, 2020
फाशीच्या काही तास आधी दोषीनी पुन्हा एकदा कायदेशीर डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. दोषींचे वकील एपी सिंह यांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. परंतु ती फेटाळण्यात आली. यानंतर एपी सिंह सुप्रीम कोर्टात गेले, मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली. पहाटे सव्वा तीन वाजता चारही दोषींना उठवण्यात आलं. पण त्यांना रात्रभर झोप लागली नाही.