नवी दिल्ली : गेल्या काही काळात केंद्र सरकारने स्वास्थ आणि आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नुकतेच केंद्र सरकारने वेदना आणि तापावर वापरल्या जाणाऱ्या निमेसुलाइड या औषधावर बंदी आणली आहे. 100 मिलीग्रामपेक्षा जास्त डोस असलेल्या निमेसुलाइडच्या सर्व ओरलऔषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. मेसुलाइड हे नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषध आहे. जे वेदना कमी करते, परंतु त्याच्या जास्त डोसमुळे यकृत खराब होण्याचा धोका असतो, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, ही बंदी फक्त जास्त डोस (100 एमएल) असलेल्या निमेसुलाइडवरच लागू होणार आहे.निमेसुलाइड ब्रँड विकणाऱ्या औषध कंपन्यांना आता जास्त डोस असलेल्या औषधांचे उत्पादन थांबवावे लागणार आहे. जी औषधे आधीच बाजारात आहेत, ती परत मागवावी लागणार आहेत. ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 च्या कलम 26 अ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या औषधाचा मोठा डोस मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, निमसुलाइडच्या अतिवापरामुळे यकृतावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो. या औषधाच्या दुष्परिणामांबाबत जगभरात संशोधन सुरु असून याबाबत अनेकठिकाणी चौकशीही सुरु आहे. निमसुलाइडला पर्याय म्हणून बाजारात अनेक सुरक्षित पेनकिलर औषधे उपलब्ध आहेत. ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डाने दिलेल्या शिफारसींनंतर ही बंदी लागू करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, पेनकिलर औषधांच्या अतिवापरामुळे केवळ यकृतच नाही तर मूत्रपिंडावरही वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोणतेही वेदनाशामक औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, औषधांचा डोस स्वतःच्या मनाने ठरवू नये आणि औषधांच्या पॅकेटवरील घटक आणि डोसची क्षमता तपासून पाहावी.