विशाखापट्टणम : जागतिक व्यापार संघटनेच्या जागतिक व्यापारावरील सुधारणांचे बदललेल्या परिस्थितीत भारताने नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मत जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुख गोझी ओकांझो यांनी व्यक्त केले आहे. भारताची या क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय उद्योग महासंघाने भारत आणि युरोपियन महासंघादरम्यान सहकार्य परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, भारत सध्या विकासदर क्षेत्रात जगाचे नेतृत्व करत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात आता भारत जगात पुढारलेला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या सुधारणामध्ये काही अडथळे येत आहेत. हे अडथळे दूर करणार्यांसाठी भारत पुढाकार घेऊ शकतो. जागतिक व्यापार बळाच्या आधारावर होण्याऐवजी नियमाच्या आधारावर होण्याची गरज वाढत चालली आहे. बरेच देश निर्यात वाढवण्यासाठी वाटेल ते करत आहेत. अशा परिस्थितीत नियमांचे राज्य स्थापित होण्याची गरज आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा अशी जागतिक व्यापार संघटनेची इच्छा आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमाबाबत अमेरिका आणि भारतासह अनेक देशांनी काही हरकती घेतल्या आहेत. यावर सर्वांनी एकत्र बसून विचार करण्याची गरज आहे. जागतिक व्यापार नियमाच्या चौकटीत होण्याची गरज आहे. जर हा व्यापार नियमांच्या चौकटीत झाला नाही तर विकसित देशांबरोबरच विकसनशील देशांनाही भोगावे लागणार आहे. सध्या अनेक देश पारस्पारीक पातळीवर व्यापार करार करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसा अधिकार त्या देशांना आहे. हे मात्र बहुस्तरीय व्यापार जगासाठी योग्य ठरतो. अजूनही जगातील 72 टक्के व्यापार जागतिक व्यापार संघटनेच्या बहुस्तरीय नियमांच्या चौकटीत होत असल्याचा दाखला त्यांनी दिला. अमेरिकेने अनेक देशांविरोधात एकतर्फी आयात शुल्क वाढविल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे. मात्र अमेरिका असेल का करत आहे हे समजून घेण्याची गरज आहे. अनेक देश अनौपचारिक पातळीवर इतर देशाची आयात रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अमेरिका नाराज झाली असल्याचे त्यांनी सूचित केले.