किराणा जेवण पोहचवणाऱ्यावरही घातली बंदी.
जामखेड (प्रतिनिधी) : शहरात लॉकडाऊनला अठरा दिवस पुर्ण झाले या अठरा दिवसांच्या कालावधीत शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना, भारतीय जैन संघटना, सह आनेक संघटना गरीबांना कीराणा सामान व जेवन वाटप केले आहे. तसेच हे कार्य पुढे देखील चालु ठेवायचे होते. मात्र शहरात अचानक १४ तारखेपर्यंत म्हणजे पाच दिवसांसाठी जामखेड शहरात अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच याचा नियम शहरातील ज्या सामाजिक संस्था जेवण पुरवत होत्या त्यांना देखील लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाने जेवण व किराणा वाटप करण्यास मज्जाव केला आहे त्यामुळे गेल्या १९ दिवसापासून गरिबांना मिळणारे जेवन बंद झाल्याने त्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.
जामखेड मधील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या माध्यमातून जामखेड शहरात जवळपास एक हजार ८०० जेवणाचे डब्बे नागरिकांना पुरवण्याचे काम सुरु होते मात्र हॉटस्पॉट घोषित झाल्याने १ हजार ५०० कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच दुसरीकडे शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत आहे. मात्र अद्यापही जामखेड तालुक्यात शिवभोजन थाळी सुरू झालेली नाही. त्यामुळे जामखेड येथील गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अत्यावश्यक वस्तू चढ्याभावाने….
जामखेड शहरातील सर्व भागात जिल्हाधिकारी यांनी हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून सक्तीने प्रतिबंध आदेश पारित केले आहे, अत्य आवश्यक वस्तु पुरवठा करण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाकडे आहे. त्या पद्धतीने नियोजन देखील करण्यात आले आहे. मात्र नागरिकांना प्रतिबंधीत भागात किराणा, दुध, भाजीपाला चढ्याभावाने मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“ज्या शहरात सहा पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत त्या भागात हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. या मध्ये जामखेड चा समावेश आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देखील बंद केल्या आहेत. तसेच अनेक गोरगरीबांना आठ दिवस पुरेल एवढा किराणा सामान सामाजिक संस्थानी वाटप केला आहे. तसेच भाजी, दुध, औषधे व पाण्याचे जार घरपोहच करण्यासाठी संबंधित व्यक्तींची नेमणुक केली आहे. १४ तारखेपर्यंत नागरीकांनी सहकार्य करावे”. -विशाल नाईकवाडे, तहसीलदार