नवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची महान अष्टपैलू कपिल देव यांच्याशी तुलना केल्याने समीक्षकांच्या टीकेचा धनी बनलेल्या माजी कसोटीपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी समीक्षकांनाच फटकारले आहे. कपिलची कोणाशीच तुलना होणार नाही मात्र, कपिलमध्ये जी जिद्द, कणखरपणा, नेतृत्वक्षमता आणि पराकोटीचा आत्मविश्वास होता, तेच गुण सध्याच्या भारतीय संघात कोहलीमध्ये दिसतात, असे श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे.
महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व सोडल्यानंतर विराटकडे कर्णधापद आले. संघाच्या फलंदाजाचा कणा असलेल्या विराटने अपेक्षेपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने ही जबाबदारी सांभाळली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा अपवाद वगळता त्याने संघाला अव्वल स्थानी पोहोचविले आहे. त्याच्या स्वभावात तसेच कणखरपणात मला नेहमी कपिलचा भास होतो. कपिल देखील असाच होता, कोणत्याही गोष्टीचे दडपण घेण्यापेक्षा त्याला सामोरे जायचे व सामना करायचा असा कपिलचा स्वभाव होता, त्याचीच झलक विराटमध्ये दिसते, असेही श्रीकांत यांनी सांगितले.
कपिलच्या नेतृत्वाखाली मी खेळलो आहे त्यामुळे विराटमध्ये कपिलचे सर्व गुण दिसतात हे मी ठामपणे सांगू शकतो. 1983 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेची आठवण सांगायची तर वेस्ट इंडिजविरुद्ध आम्ही अंतिम लढतीत खूपच कमी धावसंख्या केली होती व हा सामना जिंकू शकत नाही याची खात्री संघातील कपिल वगळता सगळ्यांना होती. एका पत्रकाराशी बोलुन कपिल ड्रेसिंगरुममध्ये परतला व आमचे पडलेले चेहरे पाहून म्हणाला, मला माहित आहे ही धावसंख्या जिंकण्यासाठी पुरेशी नाही; पण लढण्यासाठी पुरेशी आहे. चला लढून पाहू. त्याच्या या एका वाक्याने संघात उत्साह संचारला व त्यानंतर जे काही घडले तो इतिहास बनला. सध्या संघातील खेळाडूंमध्ये हीच जिद्द व आत्मविश्वास फुंकण्याचे काम विराट करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पंतला पाठिंबा द्या
ऋषभ पंत चांगला खेळाडू आहे. धोनीचा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहू नका. धोनीची गुणवत्ता आणि पंतची गुणवत्ता यांची तुलना केली तर पंतच काय कोणीही त्याची जागा घेऊ शकत नाही. पंतकडे गुणवत्ता आहे फक्त त्याला गरज आहे ती पाठिंब्याची. त्याच्यावर दडपण आणण्यापेक्षा त्याला थोडा वेळ द्या, असेही श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे.