महाड – बारसू रिफायनरी प्रकल्पाला आपले सरकार पाडले आणि सहमती आली. कारण, मी ठरवले होते, अंतिम मंजुरीसाठी स्वत: तिथे जात लोकांशी बोलेन. हो बोलले तर प्रकल्प येईन. नाही म्हणाले तर कंपनीस निघण्यास सांगेल. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राचे पोलीस दल बारसूत उतरवले आहे.
घरात, गच्चीत, बाल्कनीत आणि बाथरूममध्येही पोलीस गेले असतील. पण, एवढे पोलीस चीनच्या सीमेवर लावले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती, असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. महाड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रात बसलेले नेभळट चीनबद्दल एक शब्द काढत नाही. बारसूतील कोकणी भूमिपुत्रावर लाठ्या चालवत अश्रूधुर सोडत आहे.
प्रकल्प सोन्यासारखा असेल, तर लाठ्या का चालवत आहात? आज जिकडे बंदी करत आहात, रिफायनरी आल्यावर प्रवेश कसा करून देणार आहात? त्यामुळे प्रकल्प होऊन देणार नाही. कोकणी बांधव हो म्हणत नाही, तोपर्यंत प्रकल्प होणार नाही. कोणाच्या कितीही पिढ्या बारसूत उतरुद्या. संपूर्ण महाराष्ट्र बारसूत उतरेल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला आहे.
हा महाड मतदारसंघ आपला आहे. केवळ निवडणुकीपुरता नाही. भगव्याला कलंक लावण्याची कोणाची हिंमत नाही. इकडे जशी मतं आहेत, तशी पवित्र मातीही आहेत. तसेच काही जणांना तर माझ्यावर टीका केल्याशिवाय घसाखाली घास उतरत नाही आहे. मला असं वाटायला लागले आहे की, माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना रोज भाकर मिळत नाही. मला एक समाधान आहे की, माझ्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांना भाकरी मिळते, दोन घास मिळतात हेही नसे थोडके, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.