पाचगणी – जावळी तालुक्यातील बळीराजाचे जीवनमान उंचावण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. गेले कित्येक वर्ष अडचणीत असणाऱ्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे धुराडे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या भागीदारातून पेटणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. तालुक्यातील बळीराजाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बळ दिल्यानेच जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.
1999 मध्ये सहकारी तत्त्वावर उभा राहिलेला दिवंगत लालसिंगराव शिंदे यांनी उभारलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना जावली तालुक्यातील दुर्गम भागात हालाखीचे जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विकासाचा केंद्रबिंदू ठरला होता. मात्र सुरुवातीला काही वर्ष सुरळीत चाललेला कारखाना कर्जाच्या अडचणीमुळे पूर्ण क्षमतेने गळीत हंगाम पूर्ण करू शकला नाही.
त्यामुळे हा कारखाना किसनवीर कारखान्याशी करारबद्ध झाला, किसनवीर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन मदन भोसले यांनी या कामी पुढाकार घेतला होता. मात्र जावलीतील शेतकऱ्याची अवस्था पुन्हा आगीतून उठून फुफाट्यात पडल्याप्रमाणे झाली. किसनवीर कारखाना प्रतापगडच्या मदतीला येऊनही प्रतापगडचा गळीत हंगाम पुन्हा सुरू होण्याकरता मूहूर्त शोधावा लागला होता. गळीत हंगामातील अनेक तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांचा ऊस म्हणावा इतका पूर्ण क्षमतेने जात नव्हता.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर किसन वीर कारखान्याच्या सभासदांनी वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे कारखान्याची सत्ता सोपवली. सहकारातील दिग्गज म्हणून ओळखले गेलेले सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावलीतील शेतकऱ्यांच्या ऊसाला कायमस्वरूपी कारखाना मिळावा म्हणून प्रतापगड सहकारी साखर कारखान्यांमध्ये लक्ष घातले आहे. प्रतापगड सहकारी कारखान्याबरोबर अजिंक्यतारा कारखाना भागीदारी तत्त्वाने चालवला जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तालुक्यातील बळीराजाला मोठा मदतीचा हात मिळाला आहे. जावली तालुक्याचे गेल्या एक दशकाहून अधिक काळ आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नेतृत्व केले, येथील बळीराजाच्या शेतीमालासाठी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याचा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाचा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. जावली तालुक्यातील बळीराजाचे बळ खऱ्या अर्थाने या निर्णयामुळे वाढणार आहे.
दुर्गम जावळीचे नेतृत्व करत असताना शेतकऱ्यांच्या मूलभूत शेतीच्या पाण्याच्या प्रश्नांवर शेतीतील उत्पादन आणि जोडीला कारखाना निर्माण करून जावळीच्या शेतकऱ्याला बळ देण्याचा आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. डोंगरी समजल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उचललेले हे पाऊल महत्वपूर्ण मानले जात आहे. समाजकारणातून पीडित शेतकऱ्याला सहकाराच्या माध्यमातून मदतीचा हात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे . आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजकीय कारकिर्दीला सुध्दा हा निर्णय खऱ्या अर्थाने बळ देणार आहे.