इस्लामाबाद – युवराजसिंगने स्थापन केलेल्या समाजसेवी संस्थेला जेव्हा मी 10 हजार अमेरिकन डॉलरची मदत केली होती तेव्हा पाकिस्तानी नागरिकांनी माझ्या भूमीकेचे कौतुक केले होते. मात्र, जेव्हा युवराज व हरभजनसिंगने माझ्या कामाचे कौतुक केले. माझ्या कार्याला मदत करण्याचे आवाहन केले तेव्हा भारतीयांना मिरच्या का झोंबल्या, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
करोनाचा प्रसार पाकिस्तानातही वाढत आहे. माझ्या देशातील जनतेला ज्या कोणत्या मदतीची गरज आहे ती पूर्ण करणे माझे पहिले कर्तव्य आहे. केवळ पाकिस्तानातील मुस्लिमच नव्हे तर अल्प संख्याक हिंदूंसाठीही मी पुढाकार घेत मदत केली. माझ्या कामाचे मोल युवराज व हरभजनने जाणले व माझे अभिनंदनही केले. मात्र, भारतातील काही लोकांनी त्यासाठी या दोन खेळाडूंवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. भारतातील काही लोकांची मानसिकता इतकी खालावली आहे की त्यांना सामाजिक जाणीवदेखील नाही, अशी विचारणाही आफ्रिदीने केली आहे.
मी कॅनडात असताना युवराजने केलेले सहकार्याचे आवाहन माझ्या वाचनात आले. त्यानंतर एका कार्यक्रमात सहभागी झालेलो असतानाच मी युवराजच्या संस्थेला 10 हजार डॉलरची मदत केली. त्याचे वृत्त परदेशातील तसेच पाकिस्तानातील अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. त्यावेळी पाकिस्तानी असूनही भारतीय क्रिकेटपटूला का मदत केली अशी विचारणा कोणत्याही पकिस्तानी नागरिकाने केली नाही. उलट माझे कौतुकच केले. मग तसेच मोठे मन भारतीयांना का दाखविता आले नाही, असेही आफ्रिदीने विचारले आहे.
सोशल मीडियावर आफ्रिदीला पाठिंबा दर्शवल्यामुळे युवराज आणि हरभजन यांना भारतीय नेटकरी मंडळींनी कठोर शब्दात ट्रोल केले होते. जात, धर्म व माणुसकीला जास्त महत्त्व द्यायचे का नाही हे आता या मंडळींनी ठरवायचे आहे, असेही आफ्रिदी म्हणाला.
शोएबचा गावसकरांना टोला
एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल, पण भारत आणि पाकिस्तान मालिका होणार नाही, अशा शब्दात लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी पाकिस्तानच्या शोएब अख्तरला टोला हाणला होता. मात्र, शोएबनेही गावसकरांना उत्तर देत गेल्या वर्षी लोहारमध्येही बर्फ पडला होता, त्यामुळे भारत पाक सामने अशक्य वाटत असले तरी होऊ शकतात, असे सांगत टोला दिला आहे.