मुंबई – भारताचा नवोदीत क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने सुरवातीच्या काळात अनावधानाने झालेल्या चुका दूर करुन येत्या काळात जबाबदारीने वर्तन करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. तसेच माझ्या वर्तनावर तसेच खेळाशी असलेल्या बांधिलकीवर सातत्याने टीका करणाऱ्या टीकाकारांना आपल्या बॅटनेच उत्तर देणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
सध्या देशात करोनाचा धोका वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केले आहे. याचा परिणाम म्हणुन क्रीडा स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर, काही स्पर्धा रद्दही झाल्या आहेत. याचवेळी क्रिकेटचेही सामने बंद आहेत, त्यामुळे खेळाडूंना आपल्या परिवारासाठी वेळ देता येत आहे. मात्र, त्याचवेळी या काळात मी आत्मपरीक्षण करत आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना माझ्याकडून काही चुका झाल्या. काही सामन्यांत माझी कामगिरीही चांगली झाली नाही. त्यावेळी खरेतर मला प्रोत्साहन मिळायला हवे होते. परंतु त्यावेळी टीकाकारांनी मला लक्ष्य केले.
मला एका सामन्यात घोट्याला दुखापतही झाली होती व त्यावेळी मी अनावधानाने चुकीचे औषध घेतले. या औषधावर उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी समितीने बंदी घातल्याचे मला माहीत नव्हते अन्यथा माझ्याकडून अशी चूक झाली नसती व माझ्यावर बंदीही लावली गोली नसती. पण आता त्या गोष्टींचा पुन्हा उल्लेख करण्यात काहीच अर्थ नाही. एक मात्र या निमित्ताने सांगतो की येत्या काळात मी टीकाकारांना तोंडी प्रत्युत्तर देण्याएवजी बॅटने उत्तर देईन, असा विश्वाही पृथ्वीने व्यक्त केला.
सचिन सरांचे मार्गदर्शन मोलाचे
मुंबई रणजी संघात किंवा भारतीय संघात निवड झाल्यानंतर काहीवेळा मला अपयश आले. मात्र, त्यावेळी मला सचिन तेंडुलकर सरांनी सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांचा सल्ला व सूचनांचा मला आज लाभ होत आहे. खेळाकडे तसेच कारकीर्दीकडे पाहताना एक प्रकारची जबाबदारीची जाणीव होते, असेही पृथ्वीने स्पष्ट केले.