इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन दोन दिवस उलटून गेले. मतमोजणी सुरू होऊन देखील तितकाच कालावधी होऊन गेला आहे. तरिही मतमोजणीबाबत स्पष्टता मिळू शकलेली नाही. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने समर्थन दिलेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती मिळते आहे. तर नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गट हा सर्वात मोठा पक्ष ठरतो आहे.
यामुळे नवाझ शरीफ आणि इम्रान खान या दोन्ही माजी पंतप्रधानांनी निवडणुकीचा कौल आपल्याच बाजूने असल्याचा दावा केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर देशात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी रात्रीपासून राजकीय पक्षांंच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर आणि चारही प्रांतांमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव केली जाऊ लागली आहे.
नवाझ शरीफ यांनी देखील आपले धाकटे बंधू आणि माजी पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांना पीपीपी, एमक्यूएम-पी आणि आघाडीतील अन्य पक्षांशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. इम्रान खान यांना सत्तेवरून हटवल्यानंतर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारमध्ये पीपीपी आणि पीएमएल-एन हे दोन पक्ष प्रमुख पक्ष होते. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आता निवडणुकीचे निकाल यायला लागल्यावर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यावर पुन्हा एकदा आघाडीची जुळवाजुळव केली जाऊ लागली आहे.
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या निकालांप्रमाणे पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार ९१ जागांवर आघाडीवर आहेत. तर पीएमएल-एन आणि पीपीपीचे उमेदवार अनुक्रमे ७१ आणि ५४ जागांवर आघाडीवर आहेत.
दुसरीकडे अनधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २६५ सदस्यांच्या संसदेतील २५५ जागांपैकी १०० ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. शहबाज शरीफ यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांच्या निवासस्थानी पीपीपी नेते आसिफ अली झरदारी आणि बिलावल भुट्टो-झरदारी यांची भेट घेतली. यावेळी भविष्यातील आघाडीबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे. ही सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे.
सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एमक्यूएम-पीने निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नवाझ शरीफ यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. तथापि, पीएमएल-एनच्या निराशाजनक कामगिरीने एमक्यूएम-पीने फेरविचार करण्याचे सूत्र अवलंबले आहे.
दुसरीकडे एमक्यूएम-पी चे समन्वयक सादिकी यांनी विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांना आपल्या पक्षात सामील होण्याचे उघड निमंत्रण दिले आहे.
इम्रान खान यांनी सोशल मीडियावरून आपल्या विजयाचे भाषण देखील करून टाकले आहे. नवाझ शरीफ यांचा लंडन प्लॅन अपयशी ठरला आहे, असे ते या भाषणामध्ये म्हणाले आहेत. मात्र त्यांचा दावा अजून पूर्ण सत्यावर आधारित नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणुकांमधील सत्यतेबाबत संभ्रम –
निवडणूक निकाल जाहीर होण्यासलागत असलेल्या उशीरामुळे या मतमोजणीच्या सत्यतेविषयी संभ्रम निर्माण व्हायला लागला आहे. युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि युरोपियन युनियनने स्वतंत्रपणे पाकिस्तानच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल हिंसा, पारदर्शकतेचा अभाव आणि इंटरनेट बंद ठेवले जाण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
इम्रान खान यांची धमकी –
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल शनिवारी मध्यरात्रीपर्यंत जाहीर केले गेले नाहीत. तर पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. आपल्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांच्या आधारे राष्ट्रीय पातळीवर संसदेमध्ये आणि पंजाब प्रांताच्या विधानसभेमध्ये पीटीआयचे सरकार स्थापन केले जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
पीएमएल-एनने घेतली सरकार स्थापनेबाबत पक्षाची बैठक
पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझने शनिवारी सरकार स्थापनेवर पक्षाची महत्त्वाची बैठक घेतली, ज्यामध्ये देशात त्रिशंकू संसद आहे. पीएमएल-एन माहिती सचिव मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, पक्षाने पीपीपी आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान सारख्या इतर पक्षांशी संपर्क आणि चर्चा सुरू केली आहे, डॉनने वृत्त दिले आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांच्या पक्षाने नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन आणि इम्रान खान यांच्या पीटीआयशी युती सरकार स्थापन करण्याबाबत कोणतेही अधिकृत संभाषण केलेले नाही.
257 जागांपैकी ज्यांचे निकाल जाहीर झाले आहेत, त्यापैकी सर्वाधिक पीटीआयचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांनी 102 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो यांच्या पीपीपीला अनुक्रमे 73 आणि 54 जागा मिळाल्या आहेत. ही रात्री 9 वाजताची आकडेवारी आहे.
नवाझ शरीफ यांच्या विजयाविरोधात इम्रान खानचा पक्ष हायकोर्टात, हेराफेरीचा आरोप
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने पीएमएल-एनचे सुप्रीमो नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाझ यांच्या विजयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पीटीआयने शनिवारी (10 फेब्रुवारी) पीएमएल-एन नेत्यांच्या विजयाला लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि हेराफेरीचा आरोप केला.
पीटीआयने म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने मतमोजणीदरम्यान योग्य प्रक्रियेचे पालन केले नाही. निवडणुकीत पराभूत झालेल्या पीटीआय-समर्थित उमेदवारांनी दावा केला की पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ईसीपी) बनावट निकालांच्या आधारे त्यांना (नवाज आणि मरियम) विजयी घोषित केले.
यापूर्वी, निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पीटीआयचे चिन्ह क्रिकेट बॅट काढून टाकले होते, त्यानंतर मोठ्या संख्येने पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
नवाझ शरीफ यांनी नॅशनल असेंब्ली-130 मधून पीटीआय-समर्थित डॉ. यास्मिन रशीद यांच्याविरुद्ध 1,72,000 हून अधिक मते मिळवून विजय मिळवला. यास्मीन यांना 113,000 हून अधिक मते मिळाली, तर त्यांची मुलगी मरियम नवाज हिने NA-119 ची जागा पीटीआय-समर्थित फारुख शहजाद यांच्या विरोधात 83,000 मते मिळवून जिंकली.
फॉर्म-45 नुसार, नवाज-मरियम हरले होते – याचिकाकर्ता
हायकोर्टातील याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या डॉ. रशीद यांनी सांगितले की, त्यांनी फॉर्म-45 नुसार शरीफ यांच्या विरोधात जागा जिंकली होती. नंतर ईसीपीने फॉर्म-47 जारी केला आणि पीएमएल-एन सुप्रिमोला यशस्वी घोषित केले. त्याचप्रमाणे शहजाद म्हणाले की मरियम मतदान केंद्राच्या निकालानुसार (फॉर्म-45) जागा गमावली होती, परंतु बनावट फॉर्म-47 द्वारे तिला विजयी घोषित करण्यात आले.
फॉर्म 45 म्हणजे काय?
फॉर्म 45 ज्याला सामान्यतः ‘मोजणीचा निकाल’ फॉर्म म्हणतात हा पाकिस्तानी निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे, ज्याचा उद्देश विशिष्ट मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेच्या निकालांचे दस्तऐवजीकरण करणे आहे.
पीटीआयने पाठिंबा दिलेल्या आणखी एका पराभूत उमेदवाराने मुलतानमध्ये पीपीपीचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या विजयाला आव्हान दिले. तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची मुलगी शहर बानो हिनेही अशाच आरोपांवरून आपल्या पराभवाला आव्हान दिले आहे.