शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारला दिसेना! अधिवेशन संपताच नाफेडची खरेदी थांबली, दर घटले

लासलगाव (जि. नाशिक) – लाल कांदा बाजारभाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रथमच नाफेडमार्फत लाल कांद्याची शेतकरी प्रोड्युसिंग कंपनीद्वारे खरेदी सुरु करण्यात आली होती. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर नाफेडच्या शेतकरी प्रोड्यूसर कंपनीच्या केंद्रावर कांद्याची सुरु असलेली खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संतप्त झाल्याची भावना आहे.
शुक्रवारी जास्तीतजास्त 1141 रुपयांवर असलेले दर आज 851 रुपयांपर्यंत खाली आल्याने गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या तुलनेत आज जास्तीत जास्त दरात 300 रुपयांची घसरण झाल्यानेही कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सकाळच्या सत्रात 400 वाहनातून लाल कांद्याची तर 300 वाहनातून उन्हाळ कांद्याची अशी 14 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. याला लाल कांद्याला जास्तीत जास्त 851 रुपये, कमीतकमी 300 रुपये तर सरासरी 650 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. लालकांद्याला जास्तीत जास्त 990 रुपये, कमीतकमी 600 रुपये तर सरासरी 800 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीसह राज्य तसेच देशांतर्गतील बाजार समितींमध्ये मागणीच्या तुलनेत अधिक कांद्याची आवक झाल्यामुळे बाजारभाव हा दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत कोसळल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नाफेडमार्फत लाल कांद्याची प्रथमच खरेदी सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
त्यानुसार गेल्या आठवड्यातील शुक्रवारपर्यंत बारा हजार मॅट्रिक टन कांद्याची खरेदी साडेतीन हजार शेतकऱ्यांकडून करण्यात आली. मात्र अधिवेशन संपताच सुरू असलेली लाल कांद्याची खरेदीही बंद करण्यात आल्याने हा केवळ देखावा होता की काय अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
ही तर शेतकऱ्यांची फसवणूक-पाटील
कांदा बाजार भावप्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी विरोधी पक्षाने विधिमंडळामध्ये शासनास वेठीस धरल्याने नाफेडच्या शेतकरी प्रोडूसर कंपन्यांमार्फत लाल कांदा खरेदी सुरु झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपुष्टात आले. सर्व सदस्य हे आपापल्या मतदारसंघांमध्ये निघून गेले आणि सुरु असलेली नाफेडची कांद्याची खरेदी बंद करण्यात आल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सरकारने फसवणूक केली आहे,अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.





