Newasa: कायद्याच्या राज्यात पारदर्शक कारभाराची अपेक्षा असताना, नेवासा नगरपंचायतीत मात्र माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नगरपंचायतीच्या “कार्यवाही वृत्तांत” अहवालाची मागणी करूनही ती उपलब्ध करून दिली जात नसल्याने, उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान आणि विरोधी नगरसेवकांनी गुरुवारी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा शहरात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. ८-८ दिवस पाणी येत नसताना, मागील सात महिन्यांत पाणीपुरवठा दुरुस्तीवर तब्बल ४० लाख रुपयांच्या आसपास खर्च झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या खर्चात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रशासकीय काळात झालेल्या बैठकीचे प्रोसिडिंग क्लोज करणे आवश्यक असताना, त्यात फेरफार करून मागील तारखेने ठराव घुसविले जात असल्याचा आरोप उपनगराध्यक्षांनी केला आहे. मुख्याधिकारी ‘नॉट रिचेबल’ – माहितीसाठी निवेदन देऊनही मुख्याधिकारी कार्यालयात फिरकलेले नाहीत. विरोधक दररोज त्यांची वाट पाहत हेलपाटे मारत आहेत, मात्र मुख्याधिकारी फोन उचलत नाहीत किंवा कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. “जर कारभार स्वच्छ असेल तर माहिती लपविण्याचे कारण काय?” असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार – मुख्याधिकाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे नगरपंचायतीत मोठ्या घोटाळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे शालिनी सुखधान यांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांनाच जर माहिती मिळत नसेल, तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.