मुळशी तालुक्यात महसूल विभागाचा कारभार रामभरोसे; नागरिकांची कामे रखडली, अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

पौड : मुळशी तालुक्यातील महसूल विभागाचा कारभार सध्या ‘रामभरोसे’ सुरू असून, तहसीलदार नसल्याने नागरिकांची दैनंदिन कामे रखडली आहेत. मागील तहसीलदार रणजित भोसले यांच्या निलंबनानंतर 30 जून रोजी मिनल भामरे यांची तहसीलदारपदी नियुक्ती झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांना पदभार न स्वीकारण्याच्या सूचना मिळाल्याने त्यांनी कार्यभार स्वीकारला नाही. परिणामी, तालुक्यातील प्रशासकीय कामे ठप्प झाली असून, नागरिकांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
सध्या प्रभारी तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे तालुका कारभाराची जबाबदारी आहे. मात्र, त्यांना कामे सुसंगतपणे हाताळण्यात अपयश येत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढत आहे. जमीन व्यवहार, भोगवटाधिकार, दाखले, फेरफार यासारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत. विशेषतः भोगवटा वर्ग 2 मधील वतन जमिनीच्या व्यवहारांसाठी तहसीलदारांचा थम आवश्यक आहे. थमअभावी 7/12 उतारे खुले होत नसल्याने खरेदीखत नोंदणीला अडचणी येत आहेत.
राज्यातील सर्वाधिक जमीन वादाची प्रकरणे मुळशी तालुक्यात असून, रिंग रोड प्रकल्प, हिल स्टेशन मंजुरी आणि औद्योगिक झोनमुळे जमीन व्यवहार झपाट्याने वाढले आहेत. असे असतानाही तहसीलदारांची कमतरता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याबाबत दैनिक प्रभातने वाचा फोडल्यानंतरही प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही. प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांनी प्रभारी तहसीलदार देशमुख यांना कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात प्रगती दिसत नाही.
स्वराज्य पक्षाचे तालुका अध्यक्ष राजू फाले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी पूर्णवेळ तहसीलदार नियुक्तीच्या मागणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
“मुळशी येथील 7/12 थम ओपन करताना गावे दिसत नव्हती. याबाबत तांत्रिक काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर थम ओपन केले जाईल.” – प्रभारी तहसीलदार मुळशी, जयराज देशमुख





