पिंपरी – महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची आज (शनिवारी) हिंदू नववर्षाचा मुहूर्त साधून भाजपाचे शहर कार्यालय गाठले मात्र या भेटीला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ठेंगा दाखविला. केवळ दोघा चौघांची उपस्थिती हा संपूर्ण शहरभर चर्चेचा विषय बनला आहे.
संपूर्ण राज्यभर शिवसेना भाजपातील वाद मिटविण्यात यश आले असले तरी पिंपरी-चिंचवड शहरातील युतीमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचेच पहावयास मिळत आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी एक पाऊल नव्हे तर चार पावले मागे घेतली तरी भाजपाचे पदाधिकारी काही एकत्र यायला तयार नाहीत. आज पुन्हा एकदा बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत खराळवाडी येथील भाजपाचे पक्ष कार्यालय गाठले. ही सदिच्छा भेट नियोजित होती. मात्र या नियोजित भेटीकडेला भाजपा कार्यकर्त्यांनी ठेंगा दाखवित पाठ फिरविली.
मावळमध्ये भाजपाचा डमी उमेदवार?
मावळ मतदारसंघात युतीतील वाद मिटत नसल्याचे शहर भाजपाकडून डमी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. हा उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गिरीश महाजन, संजय राऊत, निलम गोऱ्हे, गिरीश बापट आदी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करूनही शहरातील वाद संपुष्टात आलेला नाही. आता शहर भाजपामध्ये डमी उमेदवाराची अंतर्गत चर्चा रंगल्याने खरचं डमी उमेदवार दिला जाणार का? याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सत्ता केंद्र भाजपाच्या ताब्यात आहेत. प्राधिकरणासह, महापालिकेत शेकडो पदाधिकारी भाजपाचे असताना बारणे यांच्या भेटीदरम्यान केवळ चार पदाधिकारी उपस्थित होते. ते देखील पक्षातून अडगळीत पडलेले. सरचिटणीस प्रमोद निसळ, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्यासह रामकृष्ण राणे व संजय परळीकर याच पदाधिकाऱ्यांची पक्ष कार्यालयात उपस्थिती होती. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपा आणि शिवसेनेतील वाद विकोपालाच गेल्याचे पुन्हा एका स्पष्ट झाले आहे.
उमेदवार बदलावर भाजपा पदाधिकारी ठाम
वरवर करणी शिरुर मतदारसंघातील शिवसेना भाजपामधील वाद संपुष्टात आल्याचे दिसत असले तरी अंतर्गत कलह मात्र अद्यापही कायम आहे. मात्र युतीची सर्वाधिक वाईट अवस्था ही मावळ मतदारसंघात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपा पदाधिकारी अद्यापही श्रीरंग बारणे यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे आज सांगण्यात आले. उमेदवार बदलला तरच प्रचार अशी ताठर भूमिका भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.