MLC Election 2026: राज्यातील विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत जागावाटपावरून घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांची महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आता विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, “विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे जे नाव सुचवतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय साधण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. आठ जागा महायुतीकडे – राज्यात लवकरच विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभा संख्याबळानुसार यापैकी आठ जागा महायुतीकडे जाण्याची शक्यता असून एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे या एका जागेसाठी आघाडीतील तीनही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. पवार यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील. कोणताही निर्णय सामूहिक पद्धतीने घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या पाठिंब्याची ‘परतफेड’ म्हणून पवार यांनी ठाकरे गटाला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, पुढील महिन्यात 13 मे 2026 रोजी ठाकरे यांच्या विधानपरिषदेतील आमदारकीची मुदत संपत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर शरद पवार रविवारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या सदस्स्यांचा संपणार कार्यकाळ – या निवडणुकीत कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे. विधानपरिषद निवडणूक कशी होते? मतांचे गणित कसे ठरते? महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूक ही अप्रत्यक्ष पद्धतीने होते. विधानसभेतील आमदार (MLA) मतदान करून सदस्यांची निवड करतात. या निवडणुकीत प्रमाण प्रतिनिधित्व पद्धती (Proportional Representation) आणि एकच हस्तांतरणीय मत (Single Transferable Vote – STV) प्रणाली वापरली जाते. मतदार म्हणजे सर्व आमदार आपल्या पसंतीनुसार उमेदवारांना क्रमांक देतात (१, २, ३…). मतमोजणी करताना प्रथम पसंतीच्या मतांना प्राधान्य दिले जाते. एखाद्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी ठराविक “कोटा” पूर्ण करावा लागतो. हा कोटा साधारणपणे असा ठरतो: कोटा = (एकूण वैध मते ÷ (जागा + 1)) + 1 उदाहरणार्थ, 288 आमदार आणि 9 जागा असतील तर प्रत्येक उमेदवाराला सुमारे 28-29 मतांची गरज पडते. एखाद्या उमेदवाराला आवश्यक कोटा मिळाला की तो विजयी ठरतो. जास्तीची मते पुढील पसंतीनुसार इतर उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात. जर कोणी कोटा पूर्ण करू शकला नाही, तर सर्वात कमी मते असलेला उमेदवार बाद होतो आणि त्याची मते पुढील पसंतीनुसार वाटली जातात. ही प्रक्रिया सर्व जागा भरल्या जाईपर्यंत सुरू राहते. म्हणूनच, पक्षांचे संख्याबळ, क्रॉस-व्होटिंग आणि राजकीय रणनीती या निवडणुकीत निर्णायक ठरतात.