Politics News : मोठी बातमी ! भाजपचे 3 आमदार फुटले; केंद्रीय नेतृत्वाने घेतली गंभीर दखल
Politics News : कर्नाटक विधान परिषद (एमएलसी) निवडणुकीत झालेल्या कथित क्रॉस व्होटिंगमुळे भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली असून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Politics News : कर्नाटक विधान परिषद (एमएलसी) निवडणुकीत झालेल्या कथित क्रॉस व्होटिंगमुळे भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली असून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांना २३ जून रोजी दिल्ली येथे स्पष्टीकरणासाठी पाचारण केल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार स्थापनेनंतरची ही पहिली मोठी निवडणूक लढत ठरली. गुरुवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात जेडीएसचा उमेदवार पराभूत झाला.
निवडणुकीच्या निकालांनुसार काँग्रेसला एकूण १५१ मते मिळाली. पक्षाच्या संख्याबळानुसार अपेक्षित मतांपेक्षा तब्बल ११ मते अधिक मिळाल्याने भाजप आणि जेडीएसमधील काही आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सात जागांसाठी आठ उमेदवार –
विधानसभेच्या सदस्यांमार्फत निवडल्या जाणाऱ्या सात विधान परिषद जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे थिप्पण्णा कामकनूर, पी. व्ही. मोहन, बी. के. हरिप्रसाद, शिवण्णा बी. एस. आणि विनय कार्तिक प्रकाश हे उमेदवार विजयी झाले. भाजपचे लिंगराज पाटील आणि रघू आर. यांनी विजय मिळवला, तर जेडीएसचे गोविंदराजू यांना पराभवाचा सामना करावा लागला.
पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे तीन आणि जेडीएसचे आठ आमदारांनी कथितरीत्या क्रॉस व्होटिंग केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय भाजपच्या एका आमदाराचे मत अवैध ठरविण्यात आले.
भाजपचे ज्येष्ठ नेते आर. अशोक यांनी क्रॉस व्होटिंगची शक्यता मान्य करत, पक्षाशी विश्वासघात करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तर प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी, “क्रॉस व्होटिंग कोणी आणि कोणत्या कारणामुळे केली याची माहिती मिळाल्यानंतर पक्ष योग्य निर्णय घेईल,” असे स्पष्ट केले.
भाजपकडे मजबूत संघटनात्मक बळ –
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीतील निकाल आणि क्रॉस व्होटिंगमुळे भाजप कमकुवत झाल्याच्या आरोपांना विजयेंद्र यांनी फेटाळून लावले. “एका निवडणुकीतील निकालामुळे पक्ष संपत नाही. भाजपकडे मजबूत संघटनात्मक बळ असून कार्यकर्त्यांची ताकद आमच्या पाठीशी आहे. आम्ही या पराभवाची गंभीर दखल घेऊ, मात्र काँग्रेस सरकारविरोधातील आमचा संघर्ष कायम राहील,” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या निकालामुळे कर्नाटकातील भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून आगामी काळात पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





