आयपीएलबाबत संभ्रम कायम
मुंबई – बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे दररोज आपली मते बदलताना दिसत आहे. एकीकडे आयपीएल आयोजित करण्याचा अट्टाहास सुरू आहे तर, दुसरीकडे माध्यमांशी बोलताना मात्र, यंदा ही स्पर्धा रद्द होणार असेच संकेत देत आहेत.
करोनाचा धोका वाढत चालल्याने 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता याची तारखेपासून ही स्पर्धा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचेही स्पष्ट होत आहे. मग ही स्पर्धा जुलैमध्ये किंवा ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली तर सप्टेंबर व ऑक्टोबर या काळात घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे मंडळाच्या सूत्रानेही सांगितले होते. मात्र, रविवारी गांगुली यांनी करोनामुळे लॉकडाऊन आहे, धोकाही वाढत आहे अशा परिस्थितीत आयपीएल कशी होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मग नक्की कोणाचे खरे मानायचे, असा प्रश्न आता माध्यमांनाही सतावू लागला आहे.
देशात लॉकडाऊन असल्याने आणि महाराष्ट्रासह काही राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत त्यात वाढ केल्यामुळे ही स्पर्धा या काळात तर होणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे. आता या वर्षाअखेर केवळ जुलै आणि सप्टेंबर व ऑक्टोबर हाच कालावधी मंडळाला मिळू शकतो. मंडळाचे अन्य पदाधिकारी ही स्पर्धा रद्द झाली तर जवळपास 4 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो, त्यामुळे स्पर्धा 2 किंवा 3 मैदानांवर तसेच सामन्यांची संख्या कमी करून किंवा मिनी स्वरूपात घेण्याच्याही हालचाली सुरू आहेत. मात्र, रविवारी गांगुली यांनी व्यक्त केलेले मत या सगळ्या शक्यतांना छेद देत आहे. दक्षिणेकडील काही राज्यांनी तसेच संघ मालकांनीही या स्वरूपात स्पर्धा घेण्याला समर्थन दिले आहे.
देशातील सद्य परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. विमान प्रवासावर बंदी, कार्यालये बंद, लोकांना घराबाहेर येण्यास व विनाकारण फिरण्यावर बंदी परदेशी खेळाडूंचे व्हिसा रद्द झाले आहेत, अशा परिस्थितीत स्पर्धेबाबत इतक्यातच बोलणे योग्य नाही, असे गांगुली यांनी रविवारी व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात काय घडेल हे देखील सांगता येत नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविल्याचे जाहीर झाल्यावर लगेचच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाची इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात अद्याप मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी निर्णय अधिकृतरीत्या जाहीर केलेला नसला तरीही आता पुढील किमान 4 महिन्यात तरी स्पर्धेचे आयोजन करणे शक्य होणार नसल्याचेही संकेत मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने दिले आहे.