नवी दिल्ली – देशात करोनामुक्तांच्या संख्या आणि बाधितांच्या संख्येतील फरक एक कोटीहून अधिक झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी दिली. सध्या देशांत करोनामुक्त झालेल्यांची संख्या एक कोटी दोन लाख 11 हजार 342 आहे तर सक्रिय बाधितांची संख्या दोन लाख आठ हजार 12 आहे.
या दोन्ही वर्गवारीतील फरक एक कोटी तीन हजार 330 आहे. त्यामुळे बरे झालेल्यांचे प्रमाण प्रत्यक्ष बाधितांपेक्षा 50 पट अधिक आहे. भारताचे करोनातून बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या 24 तासांत देशांत 14 हजार 457 जण बरे झाले. तर नव्याने लागण झालेल्यांची संख्या 13 हजार 788 आहे. तर 145 जण मरण पावले.
मृतांची ही संख्या गेल्या आठ महिन्यातील सर्वात निचांकी आहे. 15 राज्यांमध्ये करोनाबळी शुन्य आहेत. तर, 13 राज्यांत एक ते 13 जण मरण पावले. एका राज्यात 10 पेक्षा अधिक बळी असून 20 राज्यात दोन बळी असल्याचे सांगण्यात आले. नव्याने बरे झालेल्यांपैकी 71.70 टक्के बाधित हे केवळ सात राज्यातील आहेत.