IMD Heavy Rain Alert : देशभरात मान्सूनचा जोर वाढला; महाराष्ट्रासह 14 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
IMD Heavy Rain Alert :

IMD Heavy Rain Alert : देशभरात नैऋत्य मान्सूनने वेग पकडला असून पुढील काही दिवसांत बहुतांश राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील १४ राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, २१ राज्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज व्यक्त केला आहे. २८ जूनपर्यंत देशातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्र, तेलंगणा, उर्वरित कर्नाटक, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत पुढे सरकला आहे. पुढील ४८ तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमधील उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
१४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा –
देशातील विविध भागांमध्ये सक्रिय असलेल्या चक्रीवादळीय परिसंचरण प्रणाली आणि द्रोणीय रेषांच्या प्रभावामुळे पुढील आठवडाभर अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मेघालयमध्ये २० सेंटीमीटरपेक्षा अधिक पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये २२ ते २३ जून तसेच २६ ते २८ जूनदरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये २२ जून रोजी, तर आसाममध्ये २३ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २२ ते २३ जून तसेच २६ ते २८ जूनदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. बिहारमध्ये २२-२३ आणि २७-२८ जून, तर ओडिशामध्ये २२ ते २५ जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोंकण आणि गोव्यात २२ ते २८ जूनदरम्यान आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. याशिवाय किनारपट्टी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
२१ राज्यांमध्ये वादळ, विजांचा कडकडाट –
पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसह देशातील विविध भागांवर सक्रिय असलेल्या हवामान प्रणालींमुळे पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये ४० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये २२ आणि २३ जून रोजी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने तीव्र वादळाचा इशारा देण्यात आला आहे. बिहार आणि झारखंडमध्येही २२ आणि २५ जून रोजी तीव्र वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेचा अंदाज आहे.
दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये २२ ते २६ जूनदरम्यान धुळीचे वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात, कोकण, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम –
मान्सून पुढे सरकत असला तरी देशाच्या मध्य आणि उत्तर भागातील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. विदर्भात २२ ते २६ जूनदरम्यान उष्णतेचा इशारा देण्यात आला असून, रात्रीचे तापमानही अधिक राहण्याची शक्यता आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशमध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. छत्तीसगडमध्ये २२ ते २३ जून, तर झारखंडमध्ये २४ ते २५ जूनदरम्यान उष्णतेचा प्रभाव जाणवणार आहे. मात्र, महाराष्ट्रात २६ जूनपर्यंत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.





