मुंबई – भारताचा ऑलिम्पिक रोइंगपटू दत्तू भोकनळ याने करोनाच्या संसर्गापासून आपल्या गावकऱ्यांना मुक्त ठेवण्यासाठी चांदवड तालुक्यातील तळेगाव रुही हे आपल्या गावाचेच निर्जंतुकीकरण केले.
सध्या देशात करोनाचा संसर्ग वाढत असून सरकारने लॉकडाऊनचाही कालावधी वाढविल्याने दत्तूही सध्या आपल्या गावी परतला आहे. ज्या गावामधून तसेच गावकऱ्यांच्या प्रेमामुळे क्रीडा क्षेत्रात इतकी मोठी मजल मारल्यानंतरही त्याचे आपल्या गावावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही हेच त्याने त्याच्या कृतीतून दाखवून दिले आहे.
माझ्या गावची लोकसंख्या जवळपास 12 हजार आहे. गावातील प्रत्येक गावकरी करोनापासून मुक्ता राहावा यासाठी मी माझे कुटुंब तसेच काही मित्रांनी संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण करण्याचे ठरविले. शेतीसाठी लागणारे फर्टिलायजर या कामी वापरण्यात आले. निर्जंतुकीकरण करण्यासाठी जवळपास 4-5 तास लागले. केवळ गावच नाही तर लोकांचा सर्वाधिक राबता असलेली महत्त्वाची ठिकाणे, दवाखाने तिथेही ही फवारणी करण्यात आली. हीच प्रक्रिया करोनाचा धोका टळूपर्यंत प्रत्येक आठवड्यात दोन वेळा करण्यात येणार आहे, असे दत्तूने सांगितले.