सिंधुदुर्ग – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कट्टर राजकीय विरोधक शनिवारी एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होते आधीपासूनच श्रेयवादावरून चर्चेचा विषय बनलेल्या चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचा. त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे श्रेयवादावरून कलगीतुरा रंगला. त्यातून ठाकरे आणि राणे यांनी एकमेकांवर शाब्दिक बाण सोडले.
कलगीतुरा सुरू करत राणे यांनी विमानतळाचे श्रेय स्वत:कडे घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे कारण नारायण राणे आहे. दुसऱ्याचे नाव येऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी 1990 मध्ये मला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवले. निवडणूक लढवून मी निवडून आलो. त्यानंतर मुंबईहून येणाऱ्या मनिऑर्डरवर चालणाऱ्या जिल्ह्याचा विकास केला. आता कोणी विकास केला ते जनताच ठरवेल. विमानतळाला आधी विरोध करणारे व्यासपीठावरच आहेत, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य केले. बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी काय काम करतात याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
राणे यांच्या वक्तव्याचा धागा पकडून मुख्यमंत्री ठाकरे यांनी पलटवार केला. राणे बोलले त्याप्रमाणे बाळासाहेबांना खोटं बोलणारे लोक आवडत नव्हते. खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं. कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. त्या विषयावर खूप बोलता येईल. पण, आजचा क्षण आदळआपट करण्याचा नाही. तर, आनंद व्यक्त करण्याचा आहे. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला. नाहीतर कोणीतरी बोलेल मीच बांधला, अशी कोपरखळी ठाकरे यांनी मारली. लघू का असेना पण एक महत्वाचे खाते राणे यांच्याकडे आहे. त्याचा वापर ते महाराष्ट्राच्या विकासासाठी करतील अशी आशा आहे, अशी मिस्कील टिप्पणीही त्यांनी केली.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकार्पण सोहळ्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राज्याचे काही मंत्रीही सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. श्रेयवादावरून सुरू असलेल्या राजकारणाचा पवार यांनी समाचार घेतला. विमानतळासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. कुठलीही गोष्ट एकट्या-दुकट्याने होत नसते, असे त्यांनी म्हटले.