मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाइन माध्यमातून आढावा बैठक घेतली.
लस आल्यानंतर राज्यात लसीकरणाची प्रक्रिया तसेच लसीच्या वितरणाच्या व्यवस्थापनासाठी एका कृती दलाची स्थापना केली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत पंतप्रधानांना दिली. यादृष्टीने राज्य सरकार सीरम इन्स्टिट्यूटसोबत सातत्याने संवाद करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
करोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने जनजीवन पूर्वपदावर आणले जात आहे. मात्र, काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
करोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्लीत, केरळमध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी 24 हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता 4700 ते 5000 रुग्ण दररोज आढळत आहेत.
रुग्ण संख्या कमी होत असली तरी राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
याप्रसंगी नीती आयोगाने देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले. छत्तीसगढ, पश्चिम बंगाल या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह इतर अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते.