यवतमाळ – अगबत्तीच्या धुरामुळे आग्या मोहोळ उठून भाजप आमदाराने आयोजित केलेला जंगल सत्याग्रह स्मृतिदिन उधळला गेल्याची अजब घटना यवतमाळच्या धुंदी बेलगव्हाणच्या जंगलात घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, महात्मा गांधी यांच्या मीठाच्या सत्याग्रहाला पर्याय म्हणून लोकनायक बापूजी अणे यांनी पुसदनजीकच्या धुंदीच्या जंगलात 10 जुलै 1930 रोजी जंगल सत्याग्रह केला होता.
त्याचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी भाजप आमदार निलय नाईक सोमवारी आपल्या सहकाऱ्यांसह धुंदीच्या जंगलात गेले होते. त्यांच्यासोबत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, अणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव पाटील कान्हेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मनीष जाधव आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मात्र, पुष्पांजली अर्पण करताना या सर्वांनी बापूजी अणे यांच्या तैलचित्राजवळ काही अगरबत्ती लावल्या. या अगरबत्तीच्या धुरामुळे झाड्या फांदीवर बसलेले आग्या मोहोळ उठले. या मधमाशा कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीवर तुटून पडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे स्मृतिदिन कार्यक्रम सोहळ्यात मोठा गोंधळ उडाला. जो तो स्वतःला वाचवण्यासाठी इतरत्र धावू लागला.
त्यानंतर आमदार निलय नाईक यांच्यासह उपस्थित मंडळी बाहेर पडत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात अनेकजण जखमी झाले. या घटनाक्रमामुळे सर्वांनी आपापल्या वाहनांनी कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला. या घटनेची पंचक्रोशित खमंग चर्चा रंगली आहे.