Bihar Election Voting Percentage:- बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी आपला हक्क बजावण्यात मोठा उत्साह दाखवला असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ६०.१३ टक्के मतदान झाले. लोकशाहीच्या या उत्सवात राज्यातील ३ कोटी ७५ लाख मतदारांनी १३१४ उमेदवारांचे भवितव्य निश्चित केले आहे. सर्वाधिक मतदान बेगुसराय जिल्ह्यात नोंदवले गेले. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील १८ जिल्ह्यांमधील १२१ जागांवर शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडली. सर्व बूथवर प्रथमच वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले. मतदानाची वाढती टक्केवारी लोकशाहीवरील लोकांचा विश्वास दर्शवते. दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ५३.७७% मतदान झाले होते, ज्यात बेगुसराय (५९.८२%) आघाडीवर होते, तर पाटणा (४८.६९%) मध्ये सर्वात कमी मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २७.६५% मतदान झाले होते, त्यावेळीही बेगुसरायमध्ये (३०.३७%) सर्वाधिक आणि पाटणा (२३.७१%) मध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मधील अनेक मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव (राघोपूर) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (EVM) कैद झाले आहे. काही विधानसभा मतदारसंघांमध्ये संवेदनशीलतेमुळे मतदानाची वेळ निर्धारित वेळेपेक्षा एक तास कमी करण्यात आली होती. सिमरी बख्तियारपूर, महिषी, मुंगेर, जमालपूर आणि सूर्यगढा (५६ बूथ वगळता) येथे संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच मतदान झाले, तर उर्वरित ठिकाणी ही प्रक्रिया ६ वाजेपर्यंत सुरू होती. निष्पक्ष आणि शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करण्यासाठी साडेचार लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पुढील दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार असून 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर हाणार आहेत.