पारनेर – महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधूमाळी चालू आहे. काही ग्रामपंचायतींनी सरपंचपदाचा लिलाव करून बोली लावल्याची बातमी वाचली. वास्तविक पाहता हा सरपंचपदाचा लिलाव नसून, लोकशाहीचा लिलाव केला आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
हजारे यांनी म्हटले आहे, ज्या लोकशाहीसाठी 1857 ते 1947 या नव्वद वर्षांत लाखो लोकांनी जेलमध्ये जावून, भूमिगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खावून अनंत हालअपेष्टा सहन केल्या. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची, असे त्यांचे स्वप्न होते.
पण सरपंचपदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे, असे आमचे मत आहे. प्रश्न उभा राहतो की, देशात लोकशाही यावी यासाठी काही लोकांनी प्राणांचे बलिदान केले, त्यांचे बलिदान व्यर्थ झाले आहे काय? किंवा 70 वर्षांत काही लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय? पंचायत राज मजबूत व्हावे, यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचे स्थान सर्वोच्च स्थान आहे.
ग्रामसभा ही गावची संसद असून, ग्रामपंचायताचे सदस्य कार्यकारी मंडळ आहे. या दोनही घटकांनी एक दुसर्यांच्या विचाराने दिल्लीची संसद लोकसभा आणि राज्याची संसद विधानसभा मजबूत करावयाची आहे. कारण आमदार आणि खासदारांना ग्रामसभा निवडून पाठविते, असे ते म्हणाले.
ग्रामसभा ही सार्वभौम असून स्वयंभू आहे. 18 वर्षांचे वय झाले, मतदान करण्याचा अधिकार आला की प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सदस्य होतो. एकदा सदस्य झाला की मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नसते. ग्रामसभा ग्रामपंचायतीला निवडून देते. अशा ग्रामपंचायत सरपंचाचा लिलाव होणे हा लोकतंत्राचा लिलाव आहे.
जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ग्रामसभेमध्ये गावच्या सर्व मतदारांच्या संमतीने अविरोध निवडणूक करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गावात मतभेद होत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात आणि पाच वर्षे खेळीमेळीच्या वातावरणात गावाचा विकास होत राहतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
गुंड, भ्रष्टाचारींना संधी मिळण्याची भीती…!
ग्रामपंचायत सरपंचपदाचा लिलाव झाला तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठविले असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक त्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.