पुणे – विमानप्रवास भाड्यात दि.1 जानेवारीपासून वाढ करण्यात आली आहे. हवाई इंधनदरात वाढ झाल्याने महत्त्वाच्या मार्गांवरील विमान तिकीटदरांत सुमारे 300 ते 500 रुपये वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून हवाई इंधनदरात 2.5 टक्के वाढ केली. यानंतर मुंबईत इंधनाचा दर 62.68 रुपये प्रति लिटरवर गेला. मुंबईहून सर्वाधिक उड्डाणे दिल्लीसाठी आहेत. इंधनातील दरवाढ 1.57 रुपयांची असून त्यानुसार विमान कंपन्यांच्या इंधनखर्चात प्रति फेरी साधारण 6 ते 7 हजार रुपयांची वाढ झाली आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी कंपन्यांनी विमान तिकीटदरात तत्काळ वाढ केली आहे, असे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या मार्गांवर वाढ झालेले तिकीट
मुंबई-दिल्ली प्रवासाचे तिकीट साधारण 500 रुपयांनी वाढले आहे. तर, गोव्याला विमानाने जाण्यासाठी आता 300 रुपये अधिक खर्च येणार आहे. याखेरीज, मुंबई-बंगळुरूसाठी 600 रुपये, मुंबई-अहमदाबादसाठी 400 रुपये तर मुंबई-नागपूरसाठी 400 रुपये अतिरिक्त खर्च येईल. मुंबई-जम्मूसाठीच्या तिकीटदरात 600 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.