नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील हिंदूंविषयी मोठे विधान केले आहे. हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत असे वकव्य भागवत यांनी केले आहे. भारत आणि हिंदूंना वेगळं केले जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले आहेत. मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे आयोजित एका कार्यक्रमत ते बोलत आहेत.
यावेळी भागवत म्हणाले की, “हिंदूंशिवाय भारत नाही आणि कोणत्याही हिंदूविना भारत नाही”. “भारत आपल्या पायांवर स्वत: उभा राहिला. हेच हिंदुत्वाचं सार आहे, याच कारणामुळे भारत हिंदूंचा देश आहे,” असे मोहन भागवत म्हणाले आहेत.
मोहन भागवत यांनी यावेळी फाळणीचा उल्लेख करत म्हटले की, “फाळणीनंतर भारताचे तुकडे झाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. कारण हिंदू आहोत ही संकल्पना विसरल्यामुळेच हे झाले. तेथील मुस्लीमदेखील हे विसरले होते. आधी स्वतःला हिंदू समजणाऱ्यांची ताकद कमी झाली, नंतर त्यांची संख्या कमी झाली. म्हणूनच पाकिस्तान भारत राहिला नाही”.
मोहन भागवत यांनी यावेळी हिंदूंची संख्या कमी होत असल्याचे म्हटले. “हिदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे किंवा हिंदुत्वाची भावनाच कमी होत आहे. भारत हिंदुस्थान असून हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत. जर हिंदूंना हिंदू राहायचं असेल तर भारताने अखंड होण्याची गरज आहे,” असे यावेळी त्यांनी सांगितले. याआधी मोहन भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना फाळणीच्या वेळी भारताने सहन केलेल्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असे म्हटले होते.