पुसेगाव, (प्रतिनिधी) – खटावसह माण तालुक्यातील गावांची तहान भागवणाऱ्या नेर तलावात सध्या ३८ टक्के पाणी साठा झाला असून जिहे कटापूर योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या पाण्याची जोरात आवक सुरू झाली आहे. मोळ डिस्कळ, बुध वेटणे राजापूर या गावातून येणाऱ्या नदी,ओढ्याच्या पाण्याने लवकरच नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरेल असा विश्वास नागरिक व शेतकरी व्यक्त करत आहेत. या तालुक्याच्या उत्तर भागात असलेला व व्हिक्टोरिया राणी यांच्या काळात बांधलेला ब्रिटिशकालीन अर्धा टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला नेर तलाव खटाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी संजीवनी ठरणारा आहे. सध्या खटाव तालुक्यात पर्जन्यमान मोजक्याच स्वरूपात असले तरी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. माण तालुक्यातील आंधळी धरणात याच नेर तलावातून बोगद्याद्वारे पाणी नेण्यात आले आहे. आंधळी धरणाच्या पाण्यावर माण तालुक्यातील लाखो शेतकरी व नागरिक अवलंबून असतात. त्यामुळे दोन तालुक्याची तहान भागवणारा तलाव अशी नवी ओळख नेर तलावाची झाली आहे.सध्या जिहे कटापूर योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीचे पाणी या तलावात सोडण्यात आले आहे. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठयामूळे अथवा लोड शेडिंगमूळे केवळ ८ ते १० तासच हे पाणी या तलावात येत आहे. मोळ, डिस्कळ, बुध राजापूर वेटणे रणसिंगवाडी भागातून येणाऱ्या ओढ्या नाल्यांच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने लवकरच नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचा विश्वास नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास या तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना नदी,पोटपाट, कालव्याच्या माध्यमातून पाण्याचा लाभ मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होत असते. त्यामुळे लवकरात लवकर नेर तलाव भरावा अशी अपेक्षाही शेतकरी व्यक्त करत आहेत.