Nepal Flood : नेपाळमध्ये महापूर; अनेक घरं, रस्ते आणि पूल वाहून गेले…, भारताकडून मोठी मदत पाठवण्याची तयारी सुरू
Nepal Flood : नेपाळच्या रसुवागढीमध्ये हिमस्खलन आणि फ्लॅश फ्लडमुळे हाहाकार. १०० हून अधिक भारतीय अडकले असून PM मोदींनी बालेन शाह यांना मदतीचा विश्वास दिला आहे.

Nepal Flood : नेपाळमधील रसुवागढी परिसरात हिमस्खलन आणि अचानक आलेल्या भीषण महामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. पुराच्या पाण्यात अनेक घरे, रस्ते आणि पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या १०० हून अधिक भारतीयांसह शेकडो नागरिक या भागात अडकले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने नेपाळला मदतीचा हात देण्याची तयारी केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून नेपाळमधील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नेपाली अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. प्रभावित नागरिकांसाठी अन्न, पिण्याचे पाणी, औषधे, मेडिकल किट, तंबू, त्रिपाल आणि ब्लँकेट यांसारखी आवश्यक मदत पाठवण्याची तयारी सुरू आहे. भारतीय वायुदलाच्या विमानांसह रस्ते मार्गानेही मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
चीन सीमेवरील भागात संपर्क तुटला
नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी परिसरात पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. रस्ते वाहून गेल्याने आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाल्याने दुर्गम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ल्हेंदे आणि भोटेकोशी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळेही मोठी हानी झाली आहे.
दरम्यान, अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काठमांडू येथील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. त्यांच्या ठिकाणाची आणि परिस्थितीची माहिती घेतली जात असून, गरजेनुसार बचाव आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मोदींचा बालेन शाह यांना मदतीचा शब्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून मदतीचा विश्वास दिला आहे. या कठीण काळात भारतातील नागरिक नेपाळमधील नागरिकांसोबत ठामपणे उभे असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारताकडून शक्य ती सर्व मानवतावादी मदत देण्याची तयारी असून, बचाव आणि मदतकार्यांसाठी भारतीय पथके सहकार्य करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०१५ मध्येही भारताची मोठी मदत
नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारताने यापूर्वीही मदतीचा हात पुढे केला आहे. २०१५ मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने ‘ऑपरेशन मैत्री’ राबवत मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदतकार्य केले होते. त्यामुळे यावेळीही भारताच्या मदतीकडे नेपाळचे लक्ष लागले आहे.
मदतीमध्ये काय असेल?
भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या मदतीमध्ये आपत्कालीन औषधे, फर्स्ट-एड किट, तयार खाद्यपदार्थ, दूध पावडर, पाणी शुद्धीकरणाच्या गोळ्या, तंबू, त्रिपाल, प्लास्टिक शीट्स, ब्लँकेट, टॉर्च, लाइफ जॅकेट आणि मलबा हटवण्यासाठी आवश्यक उपकरणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.





