Nepal news : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! मृतांचा आकडा ६२६ वर; २,४०० हून अधिक बेपत्ता, पुन्हा पुराचा धोका
Nepal news : नेपाळमध्ये हिमनदी फूटल्यानंतर आलेल्या भीषण महापुरात मृतांचा आकडा ६२६ वर पोहोचला आहे. २,४२६ जण बेपत्ता असून पुन्हा पुराचा धोका कायम आहे.

Nepal news : चीनच्या सीमेजवळील हिमकडा कोसळून बर्फ आणि दगडांचा मोठा ढिगारा वाहून आल्याने नेपाळच्या रसुवा आणि मध्य भागात आलेल्या भीषण महापुराने मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ६२६ वर पोहोचला असून २,४२६ जण अद्याप बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे बचाव आणि शोधमोहीमेत अडथळे निर्माण होत आहेत.
बुधवारी हिमनदी फूटल्यानंतर बर्फ, दगड आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह परिसरात आला. यामुळे रस्ते, पूल, वसाहती तसेच जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. भोटेकोशी आणि त्रिशूली नदी परिसरात पुन्हा पाणी वाढत असल्याने प्रशासनाने नागरिक आणि बचाव पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नेपाळ आणि तिबेटमध्ये २,४२६ जण बेपत्ता
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, नेपाळमध्ये १,९२४ तर तिबेटमध्ये ५५४ जण बेपत्ता आहेत. ही संख्या वाढू शकते. नेपाळच्या आपत्ती यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्यांमध्ये ५१७ परदेशी पर्यटक आणि परदेशी कामगारांचा समावेश आहे. चीनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बाजूला आणखी २६० परदेशी नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले आहे.
नेपाळ पर्यटन मंडळानुसार, पूर आणि भूस्खलनातून १२१ पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि परदेशी कामगारांसह एकूण किती जणांची सुटका झाली, याची स्पष्ट संख्या अद्याप समोर आलेली नाही. शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने मृतांचा आकडा ५७९ सांगितला होता; त्यानंतर नेपाळ पोलिसांनी हा आकडा ६२६ वर नेला. तिबेटमध्येही सात जणांचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाले आहे.
बचावकार्याला मोठे आव्हान
पुरामुळे रस्ते उद्ध्वस्त झाल्याने चीनच्या बचाव पथकांना सर्वाधिक प्रभावित ग्यिरोंग सीमावर्ती भागात शुक्रवारी पोहोचता आले. २१ सदस्यांचे पथक आणि शोध श्वानाच्या मदतीने पर्वत, दऱ्या आणि जंगलातून दोरांच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली.
पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या मलब्याने इमारतींना वेढा घातल्याचे आणि नागरिक जीव वाचवण्यासाठी धावत असल्याचे दृश्य टेहळणी कॅमेऱ्यांत कैद झाले आहे.
नैसर्गिक तलाव फुटण्याचा धोका
पूर ओसरत असतानाच या भागात तयार झालेल्या एका तलावाचे पाणी शुक्रवारी ल्हेंडे खोला आणि त्रिशूली नदीत ओसंडून वाहू लागले. त्यामुळे नेपाळमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारी म्हणून बचावकार्य सुमारे तीन तास थांबवण्यात आले. चीनच्या बचाव पथकांनीही आपली वाहने आणि कर्मचारी सुरक्षित ठिकाणी हलवले. धोका कमी झाल्यानंतर शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली.
नेपाळ दोन अडथळा निर्माण झालेल्या तलावांवर लक्ष ठेवून आहे. हे तलाव पूर्णपणे रिकामे होईपर्यंत पुराचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. उपग्रह छायाचित्रांमध्ये दुसरा तलाव वाढत असल्याचे दिसून आले असून त्याला पाण्याचा बाहेर पडण्याचा मार्ग अद्याप दिसलेला नाही.
चीनच्या तज्ज्ञांनीही नैसर्गिक बांध फुटण्याचा इशारा दिला आहे. चीनच्या जलसंपदा मंत्रालयानुसार, तलावातील पाणी वाढत असून शुक्रवारी त्यात सुमारे २५ लाख घनमीटर पाणी साचले होते. पुढील तीन दिवसांत आणखी ३० लाख घनमीटर पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चीनच्या पूर प्रारूपानुसार, तलावाचा काही भाग फुटल्यास कमाल ५०० घनमीटर प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा प्रवाह निर्माण होऊ शकतो. मात्र हे पाणी नदीच्या पात्रातच राहण्याची शक्यता असल्याने खालील भागावर परिणाम मर्यादित राहू शकतो, असे चीनने म्हटले आहे.
भारतासह चार देशांची मदत
नेपाळने सुरुवातीला आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव पथकांची मदत नाकारली होती. स्वतःची पथके परिस्थिती हाताळण्यास सक्षम असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र नंतर भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया येथील विशेष पथकांना मदतीची परवानगी देण्यात आली. बोगद्यातील बचावकार्य, डीएनए तपासणी आणि न्यायवैद्यक कामांसाठी ही पथके मदत करत आहेत.
दरम्यान, या महापुरामुळे झालेल्या नुकसानीतून पुनर्बांधणी करण्यासाठी नेपाळला तब्बल ४ ते ५ अब्ज डॉलरची गरज असल्याचे नेपाळच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.





