अफवांवर विश्वास ठेवू नका
पुणे – बॅंक खाते उघडण्यासाठी कसल्याही प्रकारे धर्म सांगण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयातील वित्त सचिव राजीव कुमार यांनी केले आहे. यासंदर्भात समाज माध्यमात आणि इतरत्र अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन कुमार यांनी केले आहे.
यासंदर्भात काही समाज माध्यमात उलट-सुलट वृत्त येऊ लागल्यानंतर गैरसमज पसरला जाऊ नये याकरिता कुमार यांनी यासंदर्भात ट्विट करून नागरिकांना सावध राहण्यास सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, केवळ बॅंक खाते उघडताना धर्म जाहीर करण्याची गरज नाही त्याचबरोबर इतर कुठल्याही “केवायसी’साठी म्हणजे ग्राहकाची ओळख पटविण्यासाठी धर्म सांगण्याची गरज नाही. देशभरात नागरिकत्त्व सुधारणा विधेयकासंदर्भात नकारात्मक वातावरण निर्माण झाले असतानाच समाज माध्यमात आणि काही वृत्त माध्यमात भारतीय बॅंका ठेवीदारांना आणि ग्राहकांना धर्म विचारण्याची शक्यता असल्याचे वृत्त देण्यात आले होते.
यावरील ट्विटमध्ये कुमार यांनी म्हटले आहे की, कोणत्याही भारतीय नागरिकाला बॅंक खाते उघडताना किंवा खाते चालू असेल तर किंवा कुठल्याही प्रकारच्या “केवायसी’साठी धर्म सांगण्याची अजिबात गरज नाही. बॅंकांसंदर्भात पसरविल्या जात असलेल्या अशा प्रकारच्या कुठल्याही अफवांवर नागरिकांनी किंवा ग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी या ट्विटमध्ये केले आहे.
ज्याअर्थी नागरिकत्त्व सुधारणा कायदा मंजूर केला आहे आणि राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीसंदर्भात चर्चा सुरू आहे त्याअर्थी बॅंका आगामी काळात खाते उघडताना धर्म विचारण्याची शक्यता काही समाज माध्यमांनी व्यक्त केली होती. बॅंकांच्या ग्राहकांचा संबंध केवळ आर्थिक व्यवहाराशी असतो त्यामुळे धर्माची माहिती बॅंकांनी जमविण्यात कसलाही तर्क नसल्याचे अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.