– अरुण गोखले
चिंतासे चतुराई घटे, दु:खसे घटे शरीर। आशा तृष्णा ना मिटें, कह गये दास कबीर ।। संत कबीर हे जीवनात अत्यंत जागरूक होते, साक्षी होते, सतर्क होते. त्यांनी मानवी जीवन आणि मानवी मन ह्याचा खोल अभ्यास केलेला होता.
ते म्हणतात की, बाबारे! ज्याला चिंता नाही, काळजी नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. कारण आजचं झालं, उद्याच काय? ह्याचा मानवी मनात चाललेला सततचा विचार, हेच चिंतेचे मूळ उगम स्थान आहे. प्रत्येकाला कशाची ना कशाची चिंता आहेच.
कुणाला हवे ते नाही ह्याची चिंता, ज्याला आहे ते कसे टिकेल ह्याची चिंता. म्हणजेच आहे तरी चिंता आणि नाही म्हणूनही चिंता. ही जीवनातली चिंता काही आपली पाठ सोडत नाही. या आणि अशा अनेक चिंता मानवाच्या मनात सदैव येतच असतात. त्या अनंत आहेत, त्याला मर्यादा नाही.
पण होते काय की, एकदा का ही चिंता माणसाला खाऊ लागली, की ती त्याचं मन आणि शरीरही पोखरू लागते. चिंतातूर मन हे सैरभैर होते. त्याचा विवेकावरचा ताबा सुटतो. काय होईल, कसं होईल, झालं तर काय? नाही झालं तर काय? ही चिंता वाढत गेली की मानवी जीवनातले सुखाचे क्षणही कमी होऊ लागतात. संत कबीर इथे आपल्याला असा सल्ला देतात की, बाबांनो! तुम्ही एक करा, तुम्ही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नात कुठेही हलगर्जीपणा करू नका, कमी पडूू नका. चिंता करणे सोडा आणि भगवंताचे चिंतन करा.
त्या चिंतनाने काय होईल? तर तुमचा ढासळणारा मानसिक तोल, आत्मविश्वास, मनाची शांती तुम्हाला परत मिळेल. तुमची प्रभू वरची निष्ठा तुमचे मनोबल वाढवील. तुमच्या मानवी प्रयत्नाला तो दयाळू देव यश देईल. तुमचा ईश्वारावरचा विश्वास वाढेल, भक्ती वाढेल. देव पाठीराखा आहे, ह्याची अनुभूतीही येईल.
तुमची मनोबलता वाढली की चिंता, भय, काळजी हे हळूहळू तुमच्या जीवनातून काढता पाय घेतील. लक्षात ठेवा, रात्रीनंतर दिवस हा उगवतोच. अंधार कायम राहत नाही. तेव्हा जीवनाचे मोलाचे क्षण हे चिंतेत वाया न घालवता ते चिंतनात व्यतीत करा.