पाटणा : अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत बहारदार कामगिरी करत एनडीएने बिहारची सत्ता राखली. सत्ताधाऱ्यांच्या त्सुनामीत विरोधकांची महाआघाडी शब्दश: भुईसपाट झाली. एनडीएने तीन-चतुर्थांश बहुमत मिळवत बिहारच्या सत्तेवरील पकड आणखी मजबूत केली. एकूण २४३ जागा असणाऱ्या विधानसभेत सत्ताधारी आघाडीने थेट २०० चा पल्ला पार केला. सत्ताधाऱ्यांनी मिळवलेल्या घवघवीत, निर्णायक विजयाच्या तडाख्याने विरोधकांचे सत्तेचे स्वप्न भंगले. बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडीत अतिशय चुरशीची लढत होण्याचे अंदाज वर्तवण्यात येत होते. मात्र, एनडीएच्या एकतर्फी विजयाने ते फोल ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी सत्ताधाऱ्यांसाठी हिट ठरली. त्यांच्या करिष्म्यापुढे विरोधकांचा निभाव लागला नाही. त्यातून मोठा बोलबाला झालेला प्रशांत किशोर फॅक्टरही प्रभावहीन ठरला. बिहारमधील गंगा वाहत पश्चिम बंगालला जाते : मोदी बिहारमधील गंगा वाहत पुढे पश्चिम बंगालला जाते. आगामी काळात आम्ही पश्चिम बंगालमधील जंगलराज संपवू, असे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहारमधील विजयानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले, बिहारच्या प्रत्येक घरात आज मखान्याची खीर बनवली जाईल. निवडणुकीच्या निकालाने अशरक्षः विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.