Ncp Merger News : तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होती, असा दावा राष्ट्रवादी(शप) च्या ज्येष्ठ नेत्यांनी केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला आणि असे कोणतेही निर्णय घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले होते. जर दोन्ही पक्षांना एकत्र यायचे असेल आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची वाढ करायची असेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत. शेळके यांच्या भूमिकेला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही पाठिंबा दिला आहे. जर दोन्ही पक्ष सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली एकवटले, तर ते सर्वांसाठीच हिताचे ठरेल, असे बनसोडे यांनी म्हटले. दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी विलीनीकरणाला पाठिंबा दर्शवला आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाचे राष्ट्रवादी(शप) मध्ये विलीनीकरण व्हावे, अशी भूमिका मांडली आहे. २७ मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर लावण्यात आलेल्या फलकावरून अजित पवार आणि पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांचे छायाचित्र गायब होते, मात्र त्याच फलकावर सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि त्यांचे बंधू अनिकेत तटकरे यांचे छायाचित्र झळकत होते, याकडे राष्ट्रवादी(शप) च्या काही आमदारांनी लक्ष वेधले. या आरोपांना उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या, तळागाळातील स्थानिक पक्ष कार्यकर्तेच अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. ग्रामपंचायत स्तरावर आयोजित अशाच एका कार्यक्रमात आमचे दिवंगत नेते अजितदादा पवार तसेच सुनेत्राकाकींचे छायाचित्र लावण्यात आले नव्हते, याबद्दल मी खेद व्यक्त करते. अजितदादा असोत किंवा सुनेत्राकाकी आमच्या अंतःकरणात त्यांचे स्थान अढळ आहे. केवळ बॅनरवरील छायाचित्रावरून आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या निष्ठेची पारख केली जाऊ नये, असे त्या म्हणाल्या.