Navjot Singh Sidhu on Virat Kohli : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये आपल्या जुन्या लयीत परतला असून त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावल्यानंतर, त्याने देशांतर्गत ‘विजय हजारे’ ट्रॉफीमध्येही अवघ्या दोन सामन्यांत २०० हून अधिक धावा कुटल्या आहेत. विराटच्या या धमाकेदार फॉर्ममुळे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवजोत सिंह सिद्धू कमालीचे प्रभावित झाले असून त्यांनी विराटसाठी केलेली एक खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. सिद्धू यांनी इंस्टाग्रामवर विराटच्या फलंदाजीचा एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. “विराट म्हणजे २४ कॅरेट सोने” – सिद्धू सिद्धू यांनी लिहिले की, “जर देवाने मला एक इच्छा मागण्याची संधी दिली, तर मी विराटला कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेऊन पुन्हा लाल चेंडूने खेळण्याची विनंती करेन. त्याच्या पुनरागमनामुळे १५० कोटी भारतीयांना जो आनंद मिळेल, तो कशाचीही बरोबरी करू शकणार नाही.” सिद्धू यांनी विराटच्या तंदुरुस्तीचे तोंडभरून कौतुक करताना त्याला ‘२४ कॅरेट सोने’ म्हटले असून, ३७ व्या वर्षीही त्याची ऊर्जा २० वर्षांच्या तरुणासारखी असल्याचे नमूद केले. हेही वाचा – India U19 squad : अंडर १९ विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीकडे सूत्रे, पाहा संपूर्ण संघ कसोटी निवृत्तीमागचे कारण विराट कोहलीने याच वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला होता. कसोटी हा विराटचा सर्वात आवडता फॉरमॅट मानला जातो. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेली खराब कामगिरी हे त्याच्या निवृत्तीचे मुख्य कारण मानले जाते. पर्थ कसोटीत शतक झळकावल्यानंतरही संपूर्ण मालिकेत तो ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूंवर संघर्ष करताना दिसला होता. हेही वाचा – Ben Stokes : ‘जर हे इतरत्र घडले असते, तर खूप गदारोळ झाला असता’; स्कोक्सने मेलबर्न पिचवर सुनावलं आता फक्त वनडेवर लक्ष – कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर विराटने आता पूर्णपणे ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सातत्याने शतके झळकावत असून त्याने स्वतःही स्पष्ट केले आहे की, त्याचे पुढील लक्ष्य केवळ वनडे फॉरमॅटवर असेल. अशा परिस्थितीत सिद्धू यांच्या आवाहनानंतर विराट आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.