प्रभात वृत्तसेवा पुणे – नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करूनही त्याचे प्रमाण कमी होत नाही. या पुलाजवळील तीव्र उताराचा भाग कमी करणे शक्य नाही. त्यावर दोन पर्याय पुढे आले आहेत. त्यापैकी ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतलेल्या पश्चिम भागातील उर्से ते शिवरे या टप्प्यातील रिंगरोडमधील शिवरे ते कासार अंबोली यादरम्यान २२ ते २५ किलोमीटर रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करणे, हा पर्याय असून त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. २०२२ मध्ये रस्ता सुरक्षा समितीने नवले पुलाजवळील अपघात कमी करण्यासाठी विविध उपयोजना सुचविल्या होत्या. त्या सर्व उपयोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. साताऱ्याकडून येताना नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे. तो कसा कमी करता येईल, यावर दोन दिवसांपूर्वीच चर्चा झाली होती. परंतु, तो कमी करणे शक्य नाही, असे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. दरम्यान, एमएसआरडीसीने पश्चिम भागातील रिंगरोडचे काम सुरू केले आहे. उर्से ते कासार अंबोलीदरम्यान ६४ किलोमीटरचा एक टप्पा आहे. या टप्प्यात खेडशिवापूर टोलनाक्याच्या पुढे आल्यानंतर शिवरेपासून कासार-अंबोली या दरम्यानचे २२ ते २५ किलोमीटर रिंगरोडचे काम प्राधान्याने पूर्ण करणे. रिंगरोडसाठी भूसंपादन यापूर्वीच झाले आहे. त्यामुळे हे काम एक ते दीड वर्षात पूर्ण होऊ शकते, हा पुढील आठवड्यात या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येणार असून, प्रत्यक्ष जागेवरही पाहणी करण्यात येणार आहे. हे काम झाल्यावर साताऱ्यावरून येणारी सर्व जड वाहने नवले पूल मार्गे न येता थेट पौड येथील कासार अंबोली येथून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे येथे जातील, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.