पुणे -महाराष्ट्रात ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी देशव्यापी लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. राष्ट्रीय ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन दिल्ली, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पत्रकार परिषदेत कांबळे बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र सोनी, राष्ट्रीय संयोजक जावेद शेख, राजेंद्र सोनी, शेख महंमद जावेद, शेख अहंमद, मोहम्मद युनुस, महंमद शफी, रामकृष्ण रेड्डी, गजानन खापे, हबीब शेख, सुरज पाल, सुरजीतसिंग राणा, जोगींदरसिंग, राजवीर शर्मा, नरेंद्र गायकवाड, आनंद चौरे, रवी तेलरांधे आणि रिक्षा टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, “या दोन्ही संघटनेच्या वतीने हा लढा आता देशव्यापी करण्यात आला आहे. दि. 12 डिसेंबरनंतर राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. तसेच दिल्ली, जम्मू-काश्मीर, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आंदोलन एकाच वेळी उभे केले जाणार आहे. काही रिक्षा संघटना दिशाभूल करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. बोगस रिक्षा संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींची या समितीतून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने देखील ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीशी पत्रव्यवहार करावा.’
राजेंद्र सोनी म्हणाले की, देशातील राजधानी दिल्ली येथे देखील हा टू व्हीलर रॅपिडोचा प्रश्न आम्हाला सतावत आहे.
रिक्षा, टॅक्सी चालकांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबद्दल सरकार ठिम्म आहे. त्यामुळे आम्ही लढा सुरू केलेला आहे. प्रश्न न सुटल्यास पुढे हा लढा आणखी तीव्र करणार आहोत.’