आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (SP) पक्षाच्या मोर्चेबांधणीला सुरूवात; सांगलीतल्या मेळाव्यात काय ठरलं, जाणून घ्या चार महत्वाच्या गोष्टींमधून….

Nationalist Congress Party (S. P.) | Local Government Elections | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. नुकतेच जयंत पाटील यांनी आझाद मैदानावर शेतकऱ्यांच्या आंदोलनात माझं काही खरं नाही असे विधान केल्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी अधिक गती घेतली. त्यानंतर त्यांनी बारामती येथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेत काही वेळ चर्चा केली.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षात शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अनेक बडे नेत्यांनी ‘पवार साहेबां’ची साथ सोडली. पण जयंत पाटील हे त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या पक्षांतराच्या वावड्या जरी उठत असल्या तरी सध्या तशी परिस्थिती नाही, त्यामुळे ‘जयंतराव’ दादांसोबत जातील असे दिसत नाही. तर दुसरीकडे जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे बळ देण्याचे काम करत आहेत.
नुकतीच त्या अनुषंगाने सांगलीत म्हणजेच आमदार जयंत पाटील यांच्या होमपिचवर पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात जयंत पाटील यांनी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या हाती केवळ १० आमदार असताना आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्षाला बळ मिळणार का, जयंत पाटील काय करु शकतात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोट्यात काय हालचाली सुरू आहेत. याविषयी आपण जाणून घेणार आहोत…..
1 होमपीचवरची सभा बरचं काही सांगून गेली
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा सांगलीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात जयंत पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरत अनेक विधाने केली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर आपण अंदाज घेत आहोत. हा अंदाज न घेता आपण आता स्थानिक पातळीवर काम सुरू केले पाहिजे. या जिल्ह्याला संघर्ष काही नवा नाही, हा जिल्हा वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू यांचा जिल्हा. अनेक स्वातंत्र्य सैनिक या भागात होऊन गेले. त्यांचा मोठा वैचारिक वारसा या जिल्ह्याला आहे. असे म्हणत पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून केले आहे. त्यांच्या भाषणातील मुद्दे अनेक गोष्टी सांगून गेले आहेत.
2 प्रभारींची नेमणूक
लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार सत्तेवर आले. लोकसभा निवडणुकीचे कल हाती येत असताना देशात NDAला 292 तर INDIA आघाडीला 234 जागांवर आघाडी मिळाली होती. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांवर महाविकास आघाडीने आपली बाजी मारत महायुतीला थेट चॅलेंज दिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वासावर ‘स्वार’ असलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीत ८६ पैकी केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला गेला. यानंतर राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात आता दोन प्रभारींची नेमणूक कण्यात आली आहे.
3 हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे
पक्षाच्या पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दोन प्रभारींची नेमणूक करण्यात आली. हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे हे दोन नेते आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आणि राज्यातील दौरा करून पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. पक्षाच्या संघटनाची जबाबदारी या दोन नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन नेते त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र ही खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वोट बँक समजली जाते. मात्र, युतीचे सरकार आल्यानंतर पक्षाची परिस्थिती फारशी चांगली राहिलेले नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर पक्षाच्या मतांमध्ये मोठी विभागणी झाली. यामुळे आता पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडून बळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहेत.
4 जयंत पाटील राज्यात, रोहित पाटील सांगली जिल्ह्यात
या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्यूहरचनेची आखणी करण्यात आली. पक्षातील नेत्यांच्या जाहीर भाषणातूनच याची प्रचिती आली असल्याचे पाहायला मिळाले. कमी वयातील आमदार म्हणून ज्यांना तासगाव विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली ते रोहित पाटील सांगली जिल्ह्यात लक्ष घालणार आहेत. तर राज्याच्या राजकारणात जयंत पाटील हे लक्ष घालणार आहेत. जाहीर सभेतून त्यांनी आर आबा आणि त्यांची त्यावेळीची राजकारणाची हाताळणी कशी केली गेली. याची आठवण जयंत पाटील यांनी सांगितली. त्यानुसार दोन पाटलांवर पक्ष बांधणीची मोठी जबाबदारी आली आहे. यामुळे आगमी काळातील निवडणुकीत दोन पाटील काय कमाल करुन दाखवणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असल्याचे पाहायला मिळत आहे.





