पुणे – मागील अनेक महिन्यांपासून बंद असणारे राष्ट्रीय युद्ध स्मारक शुक्रवारी सर्वांसाठी खुले झाले. नूतनीकरणानंतर शुक्रवारपासून स्मारक पुन्हा खुले झाले. यासह स्मारकातील “लाईट ऍन्ड साऊंड शो’देखील सुरू झाले असून, करोनासंबंधीत सर्व नियमांचे पालन करून शुक्रवार ते रविवारदरम्यान स्मारक नागरिकांना पाहता येणार आहे.
दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी स्मारकाला पुष्पचक्र वाहून हुतात्मांना आदरांजली वाहिली.
स्मारक आवारात भारतीय सैन्याच्या महत्त्वाच्या मोहिमांतील हुतात्म्यांचे आणि परमवीरचक्र पदक प्राप्त वीरांचे अर्धपुतळे आणि शौर्याची गाथा उलगडणारे शिलालेख नव्याने उभारले आहेत. यापूर्वी येथे केवळ मुख्य स्मृतीस्थळ आणि युद्धात पाकिस्तानचे जप्त केलेले रणगाडे ठेवले होते. यासाठी दक्षिण मुख्यालयासह पुणे महापालिका आणि “ऍम्फेनॉल इंटरकनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारकामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे चरित्र उलगडण्यासाठी स्मारकात अनेक बदल केले आहेत. हे स्मारक केवळ पुण्यासाठी नव्हे तर, देशासाठी अभिमानाची बाब आहे. येथील नव्या उभारलेल्या बाबींमुळे लष्कराचा इतिहास उलगडणर असून, तरुणांनाही लष्करात येण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मोहंती म्हणाले.