चेन्नई – नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून ईडीने कॉंग्रेसच्या सोनिया आणि राहुल गांधी या माजी अध्यक्षांविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्या कारवाईचा निषेध करत पक्षाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. अशात संबंधित कारवाईविषयी नाराजी व्यक्त करत मित्रपक्ष द्रमुकही कॉंग्रेसच्या पाठिशी उभा राहिला आहे.
केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून कॉंग्रेस नेत्यांविरोधात आरोपपत्र दाखल झाले. त्या कारवाईचा मी द्रमुकच्या वतीने तीव्र निषेध करतो. गुजरातमध्ये नुकतेच कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले.
त्यावेळी त्या पक्षाने केंद्र सरकारची जनताविरोधी धोरणे नेमकेपणाने अधोरेखित केली. कॉंग्रेस पक्ष ठामपणे वक्फ दुरूस्ती विधेयकाविरोधात उभा राहिला.
इतर विरोधी पक्षांना विधेयकाविरोधात मतदान करण्यासाठी कॉंग्रेसने एकत्र केले. त्या घडामोडींमुळे भाजप अस्वस्थ झाला आहे. त्यातून कॉंग्रेसला घेरण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे.
मात्र, लज्जास्पद सुडाचे राजकारण कुणालाच मान्य होणार नाही, अशी भूमिका मांडणारे निवेदन द्रमुक संसदीय पक्षाचे नेते टी.आर.बालू यांनी जारी केले. द्रमुकच्या नेतृत्वाखालील तमिळनाडूतील सत्तारूढ आघाडीचा कॉंग्रेस पक्ष घटक आहे. ते दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीचे भाग आहेत.